रसायनामुळे फळे खाणे धोकादायक
By Admin | Updated: April 9, 2015 00:41 IST2015-04-09T00:41:25+5:302015-04-09T00:41:25+5:30
उन्हाळ्यात आंब्यासह अनेक फळे रासायनिक पावडरचा वापर करून पिकवली जातात...

रसायनामुळे फळे खाणे धोकादायक
जनजागृतीची गरज : दुर्लक्षपणा होऊ शकतो घातक
लाखनी : उन्हाळ्यात आंब्यासह अनेक फळे रासायनिक पावडरचा वापर करून पिकवली जातात. कमी वेळेतील फळांना पिकवून ते बाजारपेठेत विक्रीस मांडले जातात. मात्र कृत्रिमरीत्या पिकलेले फळ आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुले व वृद्धांना याचा धोका सर्वाधिक होण्याची शक्यता असते. धोका होऊ नये म्हणून कृत्रिमतेने पिकवलेले फळे जपून खावीत.
आंबा, केळ, पपई, चिकू यासह अनेक फळे उन्हाळ्यात कृत्रिमतेने पिकवली जातात. फळ परिपक्व होण्यापूर्वीच बाजारपेठेत आणले जाते. हंगामाच्या पूर्वी बाजारपेठेत वस्तू आणून अधिकाधिक नफा मिळविणे हा एकमेव उद्देश व्यापार्यांचा असतो. अधिकाधिक नफा मिळविण्याकरिता व्यापारी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हंगामापूर्वी बाजारातील पिकवलेल्या फळांची गर्दी यावरून फळे रासायनिक पावडरने पिकवल्याचेच द्योतक असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कृत्रिमरीत्या पिकलेल्या फळांचे सेवन न करता ती टाळलेलीच बरी. बाजारात नानाविध प्रकारचे रासायनिक पावडर सहज उपलब्ध होते. पावडरमध्ये आरोग्यास अपाय पोहोचविणारी तत्त्वे असल्याने आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारात उपलब्ध होणाऱ्या पावडरचा सहज वापर न करता योग्य सल्ला घेऊनच पावडर उपलब्ध करावे व फळे पिकवण्यासाठी त्याचा वापर करावा, जेणेकरून सुदृढ आरोग्य अबाधित राहू शकेल. (तालुका प्रतिनिधी)
फळे धुवून खावीत
फळे पिकविण्यासाठी रासायनिक पावडरचा सर्रास वापर होत असल्यामुळे त्यातील विषारी पदार्थांमुळे अपाय होऊन आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातून खरेदी केलेली फळे धुवून खावीत. आजारांना दूर ठेवावे.