५० दिवस संपले तरीही बँकांमध्ये चलन तुटवड
By Admin | Updated: December 30, 2016 01:48 IST2016-12-30T01:48:22+5:302016-12-30T01:48:22+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेताना ५० दिवसांचा अवधी मागितला होता. आता ३०

५० दिवस संपले तरीही बँकांमध्ये चलन तुटवड
नोटाबंदी : एटीएमपुढे रांगा, ग्रामीण भागात परिस्थिती बिकट
भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेताना ५० दिवसांचा अवधी मागितला होता. आता ३० डिसेंबररोजी ५० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यात चलन तुटवड्याचा प्रश्न कायम आहे. बँकांमध्ये गर्दी आणि एटीएमपुढे रांगा असून एटीएममधून अडीच हजार आणि बँकेतून आठवड्याला २४ हजार रूपयेच काढावे लागत आहे.
८ नोव्हेंबर रोजी चलनातून पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंदीचा निर्णय झाला. त्याचे परिणाम अद्यापही कायम आहे. सुरूवातीला बँकांमध्ये नोटा बदलवून घेण्यासाठी गर्दी दिसत होती. आता विड्रॉल करण्यासाठी बँकांमध्ये रांगा लावाव्या लागत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील अवस्था बिकट आहे. एटीएमची पुरेशी सुविधा नसल्यामुळे बँकांमध्ये रांगा लावाव्या लागत आहेत त्यातही दोन हजार रूपयांच्याच नोटा दिल्या जात असल्याने व्यवहारात या नोटा अडचणीच्या ठरत आहेत.
एका आठवड्यात २४ हजार रूपयेच विड्रॉल दिला जात आहे. एटीएममधून अडीच हजार रूपये निघत आहे. परिणामी अनेकांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत.
५० दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा आशावाद होता. परंतु ५० दिवस संपल्यानंतरही परिस्थिती सर्वत्र सारखीच दिसत आहे. पैसे काढण्याची मर्यादा कायम असल्याने नागरिक वैतागलेले दिसत आहे. आपलेच पैसे आपल्याला काढता येत नसल्यामुळे नागरिक बँकांमध्ये जाऊन मन:स्ताप सहन करीत आहे.
दुसरीकडे कॅशलेस व्यवहार करण्याचा आग्रह केला जात आहे. परंतु सुशिक्षित मंडळीच असा व्यवहार करायाला घाबरत असल्याने ग्रामीण भागातील अवस्था काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. कॅशलेस व्यवहारासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या जात आहे. मात्र हे आधुनिक तंत्रज्ञान सुशिक्षितांच्याही डोक्यावरून जात आहे.
दोन हजार रूपयांच्या नोटेची चिल्लर करण्यासाठी अनेकांना अडचणी येत आहेत. दुकानात ग्राहक गेल्यानंतर पहिल्यांदा चिल्लरची चौकशी करावी लागते. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ५०० रूपयांची नोट सध्या महत्त्वाची आहे. परंतु पाचशे रूपयांची नोट अद्यापही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे दिसून येत आहे.
दोन हजार रूपयांच्या नोटा हातात घेऊन चिल्लर शोधणाऱ्यांची संख्या बाजारात दिसून येते. ५० दिवस झाले तरी पहिल्या दिवसासारखीच अवस्था असून असा गोंधळ किती दिवस राहणार, हे कुणीही सांगत नसल्याचे चित्र आहे. (नगर प्रतिनिधी)
जिल्हा सहकारी बँकेचा प्रश्न कायमच
४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील आर्थिक व्यवहाराचे निर्बंध अद्यापही कायम आहे. जिल्हा बँकेला व्यवहारासाठी दररोज दोन-तीन कोटी रूपयांची आवश्यकता असते. प्रत्यक्षात या बँकेला ५० लाख रुपयांचेच व्यवहार करता येत आहे. त्यामुळे पूर्वी दोन-चार हजारांचा विड्रॉल या बँका देत होत्या. परंतु आता हजार रुपयांचाच विड्रॉल दिला जात आहे.
४कॅशलेस व्यवहाराची सध्या सक्ती केली जात आहे. प्रत्येक विक्रेता स्वाईप मशीन खरेदी करण्यासाठी पुढे येत आहे. यातून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अनेकांचे अर्ज आले आहे. त्यांचे प्रस्ताव संबंधित कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. परंतु देशभरातून मागणी वाढल्याने स्वाईप मशीनचा पुरवठा होण्यासाठी विलंब होत असून कॅशलेस व्यवहारातही अडचणी येत आहेत.
४धनादेश वठविण्यासाठी बँक अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्यामुळे खातेधारकांना कमालिचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लाखनी येथील भारतीय स्टेट बँकेत हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.