कुटुंबांच्या निरोगी आयुष्यासाठी शौचालय निर्माण करा
By Admin | Updated: September 10, 2016 00:36 IST2016-09-10T00:36:19+5:302016-09-10T00:36:19+5:30
प्रत्येक कुटूंबांना जशी निवाऱ्याची गरज आहे तशी शौचालयाची गरज आहे. शौचालयाचे बांधकाम करून वापर केल्याशिवाय निरोगी आयुष्य जगता येणार नाही.

कुटुंबांच्या निरोगी आयुष्यासाठी शौचालय निर्माण करा
धनंजय बावनकर यांचे आवाहन : मांगली येथे कुटुंबांच्या घरांना लावले हिरवे, लाल स्टिकर्स
भंडारा : प्रत्येक कुटूंबांना जशी निवाऱ्याची गरज आहे तशी शौचालयाची गरज आहे. शौचालयाचे बांधकाम करून वापर केल्याशिवाय निरोगी आयुष्य जगता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक कुटूंबांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी शौचालय निर्माण करावे व गाव गाव हागणदारीमुक्त करण्याला सहकार्य करावे, असे आवाहन उपअभियंता ग्रा.पा.पु. उप विभाग तुमसर धनंजय बावनकर यांनी केले. ते स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राबविण्यात येत असलेल्या ग्राम पंचायत मांगली येथे कुटुंब संवाद अभियानांच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते.
यावेळी उपअभियंता धनंजय बावणकर, हिरालाल पुंडे, विस्तार अधिकारी के.आर. रावतकर, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, राजेश्वर येरणे, मेश्राम, बबिता रहांगडाले, हर्षा भोयर, रिना बिसने, वर्षा दहिकर, पौर्णिमा डूंबरे, निलकंठ शेंडे व नागरिकांची उपस्थिती होती.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता, पंचायत समिती तुमसर यांचे वतीने कुटंूब संवाद अभियान २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे. तुमसर तालुक्यात ८२ ग्रामपंचायतीमध्ये कुटूंब संवाद अभियान राबविण्यात येत असून या अभियानादरम्यान गृहभेटी व शौचालय बांधकाम करण्यासाठी आवाहन पत्र वितरण करण्यात येत आहे. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात प्राथमिक बैठक घेवून स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राबविण्यात येत असलेल्या कुटूंब संवाद अभियानाचा उद्देश ग्रापदाधिकारी यांना सांगण्यात आला. त्यानंतर शौचालय नसलेले व असलेल्या कुटूंबांना गृहभेटी देवून शौचालय बांधकाम करणे व वापर करण्यासाठी स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले.
कुटूंबांना गृहभेटी देताना उपअभियंता बावनकर म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुुलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे शौचालय ही एक गरज झालेली आहे. त्यामुळे कुटूंब प्रमुखांनी आपल्या कुटूंबातील महिलांना उघड्यावर शौचास जावू न देता घरीच शौचालयाचे बांधकाम करून वापर करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. जेणे करून उघड्या हागणदारीमुळे आपल्या कुटूंबांची प्रतिष्ठा घालवावी लागणार नाही. प्रत्येक कुटूंबांनी एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून शौचालयाचे बांधकाम करावे व वापर करून आपला गाव हागणदारीमुक्त करावा, असे कळकळीचे आवाहन बावनकर यांनी केले.
शौचालय नसलेल्या कुटूंबांना गृहभेटी करून आवाहन पत्र देण्यात आले व स्वच्छतेचे महत्व सांगून घराला लाल रंगाचे स्टिकर्स लावून शौचालयाचे बांधकाम, वापर व हात धुण्याचे महत्व, सुयोग्य व्यवस्थापन, उघड्यावर हागणारी करणे ही हाणीकारक व लल्लास्पद प्रकार असल्याचे सांगण्यात आले तसेच ज्या कुटूंबांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे. त्या कुटूंबांनी शौचालयाचा वापर करावा, स्वच्छता ठेवावी. याबाबत मार्गदर्शन करून त्या कुटूंबांच्या घरांना हिरवा रंगाचे स्टिकर्स लावून लयभारीचा दर्जा देण्यात आला. कुटूंब संवाद अभियानाच्या माध्यमातून गृहभेटी करून स्वच्छतेचे महत्व सांगण्यासाठी ग्राम पंचायत पदाधिकारी, संवाद गट व तालुक्याच्या यंत्रणेनी पुढाकार घेतल्याने शौचालयाच्या कामाला गती प्राप्त होवून गाव हागणदारीमुक्त होईल, असा आशावाद यावेळी ग्रा.पं. पदाधिकारी, संवाद गट, सचिव यांनी व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)