सुरक्षेसंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 00:37 IST2017-01-10T00:37:30+5:302017-01-10T00:37:30+5:30

रस्ता सुरक्षा सप्ताह या अभियानाकडे शासनाची योजना म्हणून न पाहता हा मानवी जीवन वाचविण्याचा उपक्रम आहे.

Create awareness among security students | सुरक्षेसंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करा

सुरक्षेसंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करा

जिल्हाधिकारी चौधरी यांचे प्रतिपादन : २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ
भंडारा : रस्ता सुरक्षा सप्ताह या अभियानाकडे शासनाची योजना म्हणून न पाहता हा मानवी जीवन वाचविण्याचा उपक्रम आहे. ज्या वयात नियमांचे पालन करणे आवश्यक असते त्याच वयात आजची मुलं वेगवान वाहन चालवितात.परिणामी विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी तसेच रस्ता सुरक्षेविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतुक नियंत्रण शाखा भंडारा यांच्या वतीने स्थानिक पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित २८ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधिक्षक जोगदंड, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, मुख्याधिकारी अनिल अढागळे व पोलीस निरिक्षक (वाहतूक शाखा) गोकुळ राऊत उपस्थित होते.
‘अपनी सुरक्षा, परिवार की रक्षा, सडक सुरक्षापर ध्यान दे हे ब्रिद असलेल्या २८ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे अप्पर पोलीस अधीक्षक नांदेडकर व पाहूण्यांनी दिप प्रल्वजन करुन उद्घाटन केले. यावेळी रस्ता सुरक्षेसंबंधी माहिती देणाऱ्या घडी पुस्तिकेचे जिल्हाधिकारी व अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी म्हणाल, देशात २०१५ मध्ये १ लक्ष ८० हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यु झाला. कुठल्याही आजाराने झालेल्या मृत्यू पेक्षा हा आकडा खुप मोठा आहे. वाहतूकीचे नियम व रस्ता सुरक्षा याबाबत दक्षता घेतली असती तर मृत्युची संख्या निश्चितच घटली असती. तरुण पिढी व विद्यार्थी वाहन चालवितांना खबरदारी घेतांना दिसत नाहीत. अशा सर्वांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयात रस्ता सूरक्षा जागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
रस्ते अपघातामध्ये अनेक कुटूंबांनी आपला आधार गमाविला आहे. वडिलांनी तरुण मुलगा तर पत्नीनी आपला कर्ता पती गमाविला आहे. अशा वेळी कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळत असून आपण सर्व मिळून वाहतूकीचे नियम पाळणे व रस्ता सुरक्षा याबाबत जागृत राहण्याचा संकल्प करु या!, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे म्हणाले, वाढत्या अपघाताला आपण कारणीभूत असून रस्ता ओलांडतांना तसेच वाहन चालवितांना वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघात निश्चितपणे टाळता येतील. अप्पर पोलीस अधीक्षक नांदेडकर म्हणाल्या, अपघातात जनहानी होणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ही वाढ रोखण्यासाठी सर्व समावेशक प्रयत्न आवश्यक आहेत. पोलीस विभाग आपल्या परीने कार्य करीत असले तरी नागरिकांनी वाहन चालवितांना स्वत: सोबतच इतरांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे यांनी केले तर आभार पोलीस निरिक्षक गोकूळ राऊत यांनी मानले. रस्ते सुरक्षा संबंधी सादरीकरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Create awareness among security students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.