विलास खोब्रागडे सिल्ली/आंबाडीभंडारा : शहराचा श्वास प्लास्टिकच्या कचऱ्यात अडकला आहे. भंडारातून रोज सरासरी २७ टन कचरा निघतो. त्यात सर्वाधिक प्रमाण हे प्लास्टिकचे असते. शहराचा जीव गुदमरण्यापूर्वी प्लास्टिक मुक्त करण्याच्या मागणीसाठी मागील पाच वर्षांपासून नंदगोपाल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. यावर 'इको ब्रिक्स' हा पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो, यावर चर्चा सुरू झाली आहे.
गल्ली बोळातील नागरिकांना प्लास्टिक मुक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी नंदगोपाल फाउंडेशन पुढे सरसावले आहे. जिल्हाभर प्लास्टिकच्या पिशव्या, पेपर, चहाचे कप किंवा इतर साहित्य सर्रास विकले जात असून, नागरिकांच्या रोजच्या व्यवहारात प्लास्टिकचा वापर होताना दिसतो. त्यामुळे ठिकाठिकाणी अशा वस्तू फेकलेल्या आढळत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
'प्लास्टिक मुक्ती जनजागृती'प्लास्टिक पिशवी, तसेच इतर वास्तूंच्या वापराचे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी नंदगोपाल फाउंडेशनचे पदाधिकारी शहारासह खेडोपाडी फिरून पथ संचलन, पथनाट्य, गाणी व घोषवाक्याद्वारे जनजागृती करतात.
काय आहे इकोब्रिक्स ?'इकोब्रिक्स' हा एक पर्यावरणाशी संबंधित टर्म आहे. याचा सरसळसरळ अर्थ प्लास्टिकपासून निर्मित एक वीट होय. ज्यचा वापर आजघडीला बिल्डिंग मटेरीयल म्हणून होऊ शकतो. जे प्लास्टिक अविघटनशील आहे, अशा प्लास्टिक धुऊन, स्वच्छ करून वाळवायचे. ते नंतर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरणा करायचा. जोपर्यंत बॉटल फुल्ल होत नाही, तोपर्यंत त्यात हे प्लास्टिक भरायचे. बॉटल पूर्णतः फुल्ल किंवा ताठ झाल्यास त्याला घट्ट झाकण लावावे. आता ही 'इकोब्रिक्स' तयार झाली.
काय म्हणतो कायदा?प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारीत नियम २०२१ नुसार अशा एकल वापर प्लास्टिक वस्तूच्या साठवणूक व विक्रीवर १ जुलै २०२२ पासून बंदी घातली आहे. यात बलून स्टिक्स, सिगारेट पॅक, प्लेट्स, कप, ग्लास, काटे चमचे, ट्रे, मिठाई आदींवर बंदी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अशा वस्तूंचा वापर, उत्पादन विक्री करता येत नाही.
"हजारो मायक्रोप्लास्टिकचे कण तयार होऊन मानवी रक्तावाटे अवयवात जाऊन कॅन्सरसारखे आजार होतात. यावर प्रतिबंध हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. प्लॉस्टीक रिसायकलच्या दृष्टीने 'इकोब्रिक्स' हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो."- डॉ. यशवंत लांजेवार, संस्थापक, नंदगोपाल फाउंडेशन, भंडारा.