आठवडाभरात कोरोनाचा केवळ एकच बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:29+5:302021-06-09T04:43:29+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा एप्रिल महिन्यात हाहाकार उडाला होता. मृत्यूचेही तांडव सुरू होते. दररोज १२००च्या वर रुग्ण आणि सरासरी ...

आठवडाभरात कोरोनाचा केवळ एकच बळी
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा एप्रिल महिन्यात हाहाकार उडाला होता. मृत्यूचेही तांडव सुरू होते. दररोज १२००च्या वर रुग्ण आणि सरासरी १५ ते २० जणांचा मृत्यू होत होता. सर्वत्र भयभीत वातावरण झाले होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या कमी व्हायला लागली. त्यासोबतच मृत्यूचे प्रमाणही कमी होऊ लागले. जिल्ह्यात आतापर्यंत १०५५ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी एप्रिलपासून आतापर्यंत ७१२ जणांचा कोरोनाने बळी गेला. पहिल्या लाटेत केवळ ३४३ जणांचाच मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेने मृत्यूचे तांडव अनुभवत असताना आता मृत्यूसंख्या नियंत्रणात आली आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ४ जून रोजी मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत्यूची संख्या कमी होत असल्याने आरोग्य प्रशासनासह जिल्हा यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात तर अंत्यसंस्कारासाठीही प्रतीक्षा करावी लागत होती. गराडा येथील स्मशानभूमीत दररोज २० ते २५ मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्यात येत होते. आता मृत्यूसंख्या नियंत्रणात आल्याने संबंधितांना दिलासा मिळाला आहे.
मृत्यूसंख्येसोबतच रुग्णसंख्याही कमी होताना दिसत आहे. १ जूनपासून सरासरी १००च्या आत रुग्ण येत आहेत. सोमवारी तर केवळ १४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या. १ जून रोजी ९०, २ जून रोजी १०, ३ जून रोजी १०१, ४ जून रोजी ८५, ५ जून रोजी ३३, ६ जून रोजी ३४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. सध्या जिल्ह्याच्या एका दिवसाची जेवढी आकडेवारी येत आहे ती एप्रिल महिन्यात केवळ एकट्या गावाची असायची. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार २१२ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यात पहिल्या लाटेत १७ हजार ६४५ व्यक्तींचा समावेश होता, तर दुसऱ्या लाटेत ४१ हजार ५४७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले होते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची वेगाने संख्या वाढल्याने रुग्णालयात जागा मिळणे कठीण झाले होते. ऑक्सिजन बेडसाठीही भटकंती करावी लागत होती.
बाॅक्स
अंशत: अनलाॅक, मात्र धोका कायम
जिल्ह्यात अनलाॅक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भंडारा अनलाॅक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात असून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. मात्र अनलाॅक प्रक्रिया सुरू होताच बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीवर प्रशासन नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असले तरी नागरिक मात्र कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. नागरिक बेजबाबदारपणे वागले तर कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्यापेक्षाही भयंकर राहण्याची भीती आहे.
बाॅक्स
सोमवारी चार तालुके निरंक
सोमवारी १२५६ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात केवळ १४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. भंडारा तालुक्यात ८, पवनी ५ आणि मोहाडी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तुमसर, लाखनी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यात सोमवारी एकही रुग्ण आढळून आला नाही. तर १०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ७३४ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोट
कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी निश्चिंत राहता येणार नाही. गत आठवड्यात कोरोनाचा एकच मृत्यू झाला आहे. पाॅझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. नागरिकांनी कोविड प्रोटोकाॅलचे पालन केल्यास हा दर आणखी कमी होण्यास मदत होणार आहे. कोरोना पाॅझिटिव्ह शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे.
- संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा