मजुराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदाराला कारावास

By Admin | Updated: December 18, 2014 00:30 IST2014-12-18T00:30:27+5:302014-12-18T00:30:27+5:30

मजुराच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या एका ठेकेदाराला पवनी न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

The contractor imprisonment for the death of the laborer | मजुराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदाराला कारावास

मजुराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदाराला कारावास

भंडारा : मजुराच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या एका ठेकेदाराला पवनी न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रामकृष्ण मेश्राम रा.आसगाव असे मृत मजुराचे नाव असून गुलाब तुकाराम जिभकाटे रा. आसगाव असे कंत्राटदाराचे नाव आहे.
सन २००९ मध्ये आसगाव येथील बाबा ब्राम्हणकर यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम सुरू होते. या कामाचे कंत्राट विहिर ठेकेदार गुलाब जिभकाटे यांना दिले होते. जिभकाटे यांंनी विहिरीचे बांधकाम करण्यासाठी रामकृष्ण मेश्राम या मजुराला कामावर ठेवले होते. घटनेच्या दिवशी रामकृष्ण हा कंत्राटदार जिभकाटे यांच्या सांगण्यावरून विहिरीत उतरला. विहिरीत सिमेंटची रिंग भरताना नविन बांधकामाचे रिंग खचले आणि त्यात रामकृष्णचा दबून मृत्यू झाला.
मृत रामकृष्णचा साळा अरूण कोसरे यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी गुलाब जिभकाटे याच्याविरुद्ध भादंविच्या ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. तपास पूर्ण केल्यानंतर प्रकरण न्यायालयात सादर करण्यात आले.
दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पवनी न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जोशी यांनी निकाल दिला. यात गुलाब जिभकाटे यांनी विहिरीचे बांधकाम करताना योग्य ती काळजी घेतली नाही. त्यामुळे रामकृष्णचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून पवनी न्यायालयाने जिभकाटे याला दोन वर्ष साधा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारकडून विशेष सहायक सरकारी वकील एच.जी. नागदेवे यांंनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी पोलीस हवालदार सुभाष मस्के व पोलीस नायक रविंद्र मुंजुमकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: The contractor imprisonment for the death of the laborer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.