अनुदानाअभावी रखडले ३२५ घरकुलांचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:26 IST2016-05-19T00:26:34+5:302016-05-19T00:26:34+5:30
शासनाने घरकुलांची योजना राबविली. मात्र या योजनांचा निधी मार्च २०१६ मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत परत ....

अनुदानाअभावी रखडले ३२५ घरकुलांचे बांधकाम
शासनाने परत मागितला निधी : मोहाडी तालुक्यातील लाभार्थी प्रतीक्षेत
युवराज गोमासे मोहाडी
शासनाने घरकुलांची योजना राबविली. मात्र या योजनांचा निधी मार्च २०१६ मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत परत मागितल्याने मोहाडी तालुक्यातील ३२५ घरकुलांचे बांधकाम रखडले आहे.
अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी इंदिरा आवास योजना, राजीव गांधी आवास योजना, अनुसूचित जाती - जमातीसाठी रमाई व शबरी घरकुलांची योजना राबविली जात आहे. गरीबांना या योजनांमुळे हक्काचा निवारा प्राप्त होत आहे. मात्र मार्च २०१६ पासून सदर योजनेचा निधी मिळाला नसल्याने घरकुलांचे बांधकाम प्रभावित झाली आहेत. शासनाने सदर योजनांचा निधी आॅनलाईन पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वळता करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरून परत मागितल्याचे अधिकारी स्तरावरून सांगितले जात आहे. परंतु वापस मागितलेला निधी अजूनपर्यंत परत न पाठविल्याने घरकुलांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत रखडले आहेत. निधी अभावी घरकुलांचे बांधकाम प्रभावित झाली असून लाभार्थी पैशासाठी पंचायत समित्यांच्या चकरा काढताना दिसत आहेत. मोहाडी तालुक्यात सन २०१४ मध्ये इंदिरा आवास योजनेअंतर्गत ३७८ घरकुलांचा लक्षांक मिळाला होता. त्यापैकी ३०२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालीत. ७६ घरकुलांचे बांधकाम निधीअभावी अपूर्ण राहिली आहेत. रमाई योजनेअंतर्गत सन २०११-१२ ते २०१४-१५ पर्यंत ८०२ घरकुलांचा लक्षांक मिळाला होता. त्यापैकी ५५३ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालीत. निधीअभावी २४९ घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत. सदर योजनांना १ लाखाचे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. तीन टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांना पैसा दिला जातो. पहिला टप्पा ३७ हजार ५०० रुपयांचा दिला जातो. त्यानंतर दुसरा तर तिसरा टप्प्याचा निधी घरकुल व शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चेकद्वारा दिला जातो.
शासनाचे पत्र मिळाल्याने ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील घरकुलाचा निधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला मार्च २०१६ मध्ये परत पाठविण्यात आला. आॅनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाभार्थ्यांना पंचायत समितीला येण्याची गरज भासणार नाही. दलाली व पैसे दिल्याशिवाय कामे होत नाही. अशा तक्रारी बंद होतील. कामात पारदर्शकता येऊन लाभार्थ्यांना लाभ मिळेल.
- पंकज भोयर, खंडविकास अधिकारी, मोहाडी.
सध्या बांधकामाची वेळ आहे. या कालावधीत पैसा मिळाल्यास लाभार्थ्यांची जास्तीत जास्त घरकुले तयार होऊ शकतात. गरीबांना त्यांच्या हक्काचा निवारा उपलब्ध होवू शकतो.
- सुरेश मस्के, शाखा अभियंता मोहाडी