अनलाॅकच्या पहिल्या दिवशी बेफिकीर नागरिकांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:32+5:302021-06-09T04:43:32+5:30
भंडारा जिल्हा अनलाॅक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. सोमवारपासून बाजारपेठेच्या वेळेत अंशत: बदल करण्यात आले. सर्व प्रतिष्ठानांना व्यवसायासाठी सकाळी ७ ...

अनलाॅकच्या पहिल्या दिवशी बेफिकीर नागरिकांना तंबी
भंडारा जिल्हा अनलाॅक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. सोमवारपासून बाजारपेठेच्या वेळेत अंशत: बदल करण्यात आले. सर्व प्रतिष्ठानांना व्यवसायासाठी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली. सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ उघडल्याचे चित्र होते. नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम समोर असतानाही नागरिक धडा घेताना दिसून आले नाहीत. मास्क वापरा हे वारंवार सांगूनही अनेक जण मास्क वापरताना दिसत नव्हते. अनेकांनी मास्क केवळ हनुवटीवर लावल्याचे दिसून आले. पान, तंबाखू, खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारल्या जात होत्या. अशा व्यक्तींना ‘ब्रेक द चेन’च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड करण्यात आला. संस्कृती गारमेंटला ५ हजार रुपये, भारत फॅशन व सिटी फॅशन माॅलला प्रत्येकी दीड हजार रुपये दंड देण्यात आला. यासोबतच ११ दुकानांना दंड ठोठावण्यात आला, तसेच मास्क न घालणाऱ्या १४ जणांना दंड ठोठावला. १४ हजार ५०० रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
अनलाॅकनंतर नागरिकांना नियमांची जाणीव करून देण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी भंडारा शहरात रुटमार्चचे आयोजन करण्यात आले. त्रिमूर्ती चौक, बसस्थानक चौक, पोस्टऑफिस चौक, गांधी चौक ते मुस्लिम लायब्ररी असा रुट मार्च करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी संदीप कदम व पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी नियमांचे पालन होते की नाही याची अनेक दुकानांना भेटी देऊन स्वत: पाहणी केली. अनेक दुकानांत ग्राहक तर सोडा सेल्समनसुद्धा मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले. अशा व्यावसायिक प्रतिष्ठानांना नगर परिषदेच्या वतीने दंड करण्यात आला.
बाॅक्स
नियम न पाळणाऱ्यांवर सक्त कारवाई - संदीप कदम
अनलाॅकनंतर कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन होते की नाही याची तपासणी वारंवार केली जाईल. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. नियम न पाळणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
बाॅक्स
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची दुकानांना भेट
रुटमार्चचे नेतृत्व करताना जिल्हाधिकारी संदीप कदम व पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी शहरातील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठानांना अचानक भेटी दिल्या. त्यावेळी नियमबाह्य आढळून आलेल्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.