प्रवेशद्वारावरच अभ्यागतांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:38+5:30
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात अनेक महत्त्वाची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासह बँका, शाळा महाविद्यालय आहेत. मात्र, या सर्वांमध्ये थॅर्मल स्कॅनिंग व सॅनिटायजरची व्यवस्था पाहणीतून दिसून आले.

प्रवेशद्वारावरच अभ्यागतांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाच्या काळात शासकीय कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुठलीच तपासणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ ने रिअॅलिटी चेकच्या माध्यमातून पुढे आणले होते. याच वृत्ताची दखल घेत आता शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अभ्यागतांची तपासणी केली जात आहे. पंंचायत समिती कार्यालयात सॅनिटायजर तर तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर एका शिपायाची नियुक्ती केली आहे.
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात अनेक महत्त्वाची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासह बँका, शाळा महाविद्यालय आहेत. मात्र, या सर्वांमध्ये थॅर्मल स्कॅनिंग व सॅनिटायजरची व्यवस्था पाहणीतून दिसून आले. ‘लोकमत’मध्ये या आशयाचे वृत्त धडकताच तालुका महसूल प्रशासनाने याची दखल घेतली. गत आठवड्यात लोकमत प्रतिनिधीने तहसील कार्यालयासह पंचायत समिती कार्यालय तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तथा जिल्हा उद्योग केंद्र व अन्य कार्यालयांची अवस्था जाणून घेतली. मात्र कुठेही थर्मल स्कॅनिंग होत नसल्याची बाब समोर आली होती. फक्त जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर तपासणी होत असल्याचे दिसून आले होते. मात्र अन्य शासकीय कार्यालयात याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. यावर ‘लोकमत'ने जनजागृती अंतर्गत वृत्त प्रकाशित केले. यासंदर्भात सोमवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने शासकीय कार्यालयांचा फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी सॅनिटायजर व्यवस्था होती. तहसील कार्यालयातही मुख्य प्रवेश द्वारावर शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. पण प्रशासकीय इमारतीत कोणतीच सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली नव्हती.
जिल्हा न्यायालयात येणाऱ्यांची नोंदणी
येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी प्रवेशद्वारावर केली जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे २२ मार्चनंतर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही याची अंमलबजावणी सुरू होती. स्वच्छता व आरोग्याबाबत जिल्हा न्यायालय प्रशासनाने चांगली काळजी घेतली आहे. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची विचारपूस केली जात असल्याचे दिसले. येथे पोलिस कर्मचाऱ्यांचीही निगराणी असते.