पीक वाचविण्यासाठी कालव्याचे खोदकाम
By Admin | Updated: September 19, 2016 00:36 IST2016-09-19T00:36:26+5:302016-09-19T00:36:26+5:30
पावसाचा अभाव , सिंचन साधन नाही त्यामुळे मासळ परिसरातील हजारो एकर शेती मागील चार वर्षांपासून नापिकीची ठरली.

पीक वाचविण्यासाठी कालव्याचे खोदकाम
८५० एकर शेतीला लाभ : बाळा काशिवार यांच्या प्रयत्नाला यश
लाखांदूर : पावसाचा अभाव , सिंचन साधन नाही त्यामुळे मासळ परिसरातील हजारो एकर शेती मागील चार वर्षांपासून नापिकीची ठरली. मात्र यावर्षी नेरला उपसा सिंचनचे पाणी गावाजवळून वाहत असल्याने तब्बल तीन किमी कालव्याचे खोदकाम करून शेतीला पाणी देण्यात आले. आमदार बाळा काशिवार यांच्या प्रयत्नाला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मागील चार वर्षांपासून अपुरा पाऊस, वर थेंबी शेती त्यामुळे या भागातील शेती पिकवने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीची झाली होती. कशी-बशी पेरलेली पिके पाण्याअभावी करपल्याने पेटवल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. एकूणच या भागातील उत्पन्नात कमालीची घट झाली होती. मात्र जवळूनच नेरला उपसा सिंचन योजनेचा कालवा भरभरून वाहत सुटल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु कालव्याचे पाणी शेतापर्यंत पोहोचणे कठीणच नाही तर अशक्य होते. परंतु धान पीक या वर्षी तरी वाचवायचे म्हणून शेतकऱ्यांनी कंबर कसली. आमदार बाळा काशिवार व किशोर पंचाभाई यांना भेटून सर्व परिस्थिती सांगितली. शेतकऱ्यांचे धान पीक मरू देणार नाही पाणी शेतात पोहोचण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, म्हणून दोन जेसीबी च्या साहायाने चक्क तीन किमी कालव्याचे खोदकाम करण्यात आले.
यावेळी जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांनी श्रमदान केले. आमदार बाळा काशिवार यांनी नेरला उपसा सिंचन योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी देण्याचे मान्य केले.
पेंढरी, सोनेगाव, हारादोली या तीन गावातील जवळपास ८५० एकर धान शेती सिंचीत होणार असून सतत कोरडे राहणारे चार तलाव पाण्याने तुडुंब भरणार आहेत. सदर कालव्याचे बांधकाम केल्यास या भागातील हजारो हेक्टर शेतजमीन सिंचित होऊन उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थीक स्तर नक्कीच उंचावणार आहे.
यावेळी आ. बाळा काशिवार, किशोर पंचभाई, मनोज चुटे, माजी पं.स.सदस्य देविदास भोयर, सरपंच पेंढारी प्रदीप शेंडे, सरपंच तिरखुरी हरिषचंद्र गेडाम, पंचायत समिती सदस्य पुंडलिक पेलणे, बंडू बारसागडे, व शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार
तालुक्यातील चौरास भागात गोसे खुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे जाळे पसरले आहेत. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. ही बोंब या वर्षी सर्वच भागात ऐकायला मिळाली. त्यामुळे सर भागातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन सोडविल्या. शेतकऱ्यांची बाजू रास्त समजून त्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे आमदार बाळा काशिवार यांनी सांगितले.