ब्रिटिशकालीन पूल ठरतोय ‘धोकादायक’
By Admin | Updated: September 12, 2016 00:31 IST2016-09-12T00:31:08+5:302016-09-12T00:31:08+5:30
कधी काळी राष्ट्रीय महामार्गाची शान असलेला जुन्या महामार्गावर शहापूर ते ठाणा या गावा दरम्यान असलेला ब्रिटीशकालीन पुल अखेरचा श्वास घेत आहे.

ब्रिटिशकालीन पूल ठरतोय ‘धोकादायक’
पुलाचे कोपरे घसरले : सुरक्षा भिंत गायब, नागरिकांना करावा लागतो जीवघेणा प्रवास
शहापूर : कधी काळी राष्ट्रीय महामार्गाची शान असलेला जुन्या महामार्गावर शहापूर ते ठाणा या गावा दरम्यान असलेला ब्रिटीशकालीन पुल अखेरचा श्वास घेत आहे. या ब्रिटीशकालीन पुलाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. सुमारे ३० ते ३५ वर्षापुर्वी याच पुलावरुन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक होत होती. मात्र शहापूर ते ठाणा या दोन गावा दरम्यान महामार्गाचे सरळीकरण झाल्यानंतर हा पूल पूर्णत: अडगळीत पडला.
राज्यात महाड येथील पूल अचानक वाहून गेल्यानंतर राज्यात ब्रिटीशकालीन व जुन्या पुलाची शासन स्तरावर दखल घेण्यात आली. मात्र या पुलाकडे शासनाचे लक्ष गेले नाही. या पुलाची दाखल घेण्यात आली नाही हे विशेष.
धुळे ते कोलकत्ता या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर शहापूर ते ठाणा दरम्यान असलेल्या जुन्या महामार्ग रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळुन हंगामी वाहणा-या नाल्यावर हा उंच पुल असून या पुलाचे दोन्ही बाजुचे कोपरे घसरलेले आहेत. कोपरे घसरले असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूचा समतोल बिघडला आहे.
पक्के दगड व मुरुमाचे दगड यापासून तयार करण्यात आलेल्या चार मोठ्या पिल्लरावर हा पूल उभा असून ब्रिटीशकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. मात्र सध्या या पुलाची दुर्दशा पाहता या पुलावरुन वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. पुलाच्या सुरक्षा भिंतीचे दगड गायब झालेले आहेत. सुरक्षा भिंतीचे दगड निघाल्यामुळे पुला ओलांडताना कमालीची काळजी घ्यावी लागते.
पुलाच्या पिल्लरावर तिन ठिकाणी मोठी झाडे तयार झाली आहेत. झाडाची मुळे पुलामध्ये खोलवर रुजल्याची दिसून येते. याशिवाय पुलाचे कोपरे घसरलेल्या ठिकाणी माती व दगड बाहेर आल्याने या ठिकाणी वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे कोपरे कुठवर घसरले याचा नेमका अंदाज येत नाही. सध्याच्या राष्ट्रीय महामार्गावरुन याच पुलावरुन नांदोरा टोली, बहुजर बेघर वसाहत, परसोडी पांधनकडे रस्ता जातो. त्यामुळे सहजिकच या पुलावरुन नागरिक आवागमन करतात. तसेच सकाळ, संध्याकाळ फिरायला जाणा-या तसेच सकाळ, सायंकाळ फिरायला जाणा-या नागरिकांना याच पुलावरुन जावे लागते.शाळकरी विद्यार्थी कुतुहलापोटी पुलावरुन खाली वाकुन पाहतात. तसेच पुलाशेजारी शेतीशिवार असल्याने याच पुलावरुन ट्रॅक्टर व इतर वाहने नेली जातात. पुलाच्या दोन्ही भागाकडील कठडे गायब झाल्याने येथे केव्हाही दुर्घटना घडू शकते. महामार्गाचे सरळीकरण झाल्यानंतर या जुन्या महामार्गाच्या रस्त्याकडे व पुलाकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. धोकादायक ठरु पाहणा-या या ब्रिटीशकालीन पुलाच्या दुरुस्तीकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
सुरक्षा महत्त्वाची
राज्यात घडलेल्या दुर्घटना पाहता या पुलावर दुर्घटना घडू नये याकरिता पुलाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. शहापूर, नांदोरा टोली व ठाणा ह्या गावातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना या पुलावरुन दररोज ये-जा करावी लागते. मात्र या पुलाची दुर्दशा पाहता नागरिकांना सुरक्षीत आवागमन धोकादायक झाले आहे.