पुस्तके ई-स्वरुपात उपलब्ध व्हावी
By Admin | Updated: February 17, 2016 00:17 IST2016-02-17T00:17:06+5:302016-02-17T00:17:06+5:30
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व पुस्तके ई-पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध करुन दिलीत तर आजची तरुण पिढी आपोआप वाचनाकडे वळेल,...

पुस्तके ई-स्वरुपात उपलब्ध व्हावी
भंडारा ग्रंथोत्सव समारोप : अर्चना कसबेकर यांचे प्रतिपादन
भंडारा : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व पुस्तके ई-पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध करुन दिलीत तर आजची तरुण पिढी आपोआप वाचनाकडे वळेल, असे मत अप्पर कोषागार अधिकारी अर्चना कसबेकर यांनी व्यक्त केले. तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नीळकंठ रणदिवे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते. अर्चना कसबेकर म्हणाल्या, ग्रंथ माणसांसारखा स्वार्थी नाही. त्यामुळे पुस्तकांसारखा मित्र कायम आपल्या सोबतीला राहतो.
पुस्तकातून आपल्याला इतिहास, भुगोल, खानपान संस्कृती, यश कसे मिळवावं, समाजात कसे वागावे-बोलावे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पुस्तक का वाचावं याच महत्व जर आजच्या मुलांना पटवून दिलं तर ही पिढी सुध्दा पुस्तकांकडे वळेल. माणसाला माणुस बनण्यासाठी ग्रंथाचं व्यसन हवं. हे व्यसन एकदा लागलं की ते सुटत नाही. सातत्याने चालणारा विचार प्रवाह म्हणजे मन. या विचार प्रवाहाला आवश्यकता आहे ती शब्दांची आणि पुस्तकांची . ग्रंथ तुम्हाला शहाणपण शिकवतील ते आत्मसात करा, असे विचार निळकंठ रणदिवे यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रंथालय अधिकारी बोपचे यांनी प्रास्ताविकातून तीन दिवस पार पडलेल्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. या प्रसंगी जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विवेकानंद आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रतिमा ग्रंथालयाला भेट म्हणून दिली. यावेळी जिल्हयातील ग्रंथालयांचे ग्रंथपाल, पुस्तकप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)