-तर जैवविविधतेची साखळी संकटात
By Admin | Updated: May 13, 2017 00:19 IST2017-05-13T00:19:03+5:302017-05-13T00:19:03+5:30
पक्ष्यांचे स्थलांतरण ही नैसर्गिक घटना आहे. दरवर्षी चार हजार कि.मी.चे अंतर पार करून...

-तर जैवविविधतेची साखळी संकटात
आज आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्षी दिवस : शिकारीमुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात
नंदू परसावार । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पक्ष्यांचे स्थलांतरण ही नैसर्गिक घटना आहे. दरवर्षी चार हजार कि.मी.चे अंतर पार करून लाखोंच्या संख्येतील पक्षी उत्तरेकडील जन्मस्थानापासून दक्षिणेकडील उष्ण प्रदेशाकडे आणि पुन्हा तिथून आपल्या जन्मस्थानाकडे प्रवास करतात. या प्रवासात प्रचंड धोके असतातच. याशिवाय वाढत्या शिकारींमुळे या पक्ष्यांचा जीव जातो. मुख्यत्त्वे करून तलावावर येणाऱ्या या पक्ष्यांचे संवर्धन न झाल्यास जैवविविधता संकटात येण्याची भीती बळावली आहे.
प्राचीन काळी युरोपात हिवाळ्याला सुरूवात झाली की पाकोळी (बार्न स्वालो) धोबी किंवा परीट (वेग टेल) सारखे पक्षी अचानक दिसेनासे व्हायचे. अशावेळी हे लहान पक्षी जमिनीत ‘हिमनिद्रा’ (हिबरनेशन) करीत असावे, असा समज होता. कारण हे लहान पक्षी गारठणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी तीन ते चार हजार किलोमिटरचा प्रवास करून विषवृत्ताकडील देशात जात असावे आणि पाच महिन्यांनी तेवढाच प्रवास करून परत येत असावेत यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण होते. परंतु पक्ष्यांचा अभ्यास जसा वाढत गेला तसा या पक्ष्यांच्या नाहीसे होण्यामागील कारण उलगडत गेले. त्यानंतरच्या काळात पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या पायात रिंग घालून त्यांना सोडले गेले आणि आॅर्टिक्ट खंडातील पक्षी अंटॉर्टिका खंडात दिसू लागले.
आतातर पक्ष्यांच्या पाठीवर सॅटेलाईट रिमोट ट्रॅकर लावून पक्ष्यांच्या प्रवासाचा मार्ग शोधला जात आहे आणि त्यातून अनेक चमत्कारिक बाबी उघडकीस येत आहेत.
अन्नाच्या शोधासाठी स्थलांतरण करणारा ‘अमुर फाल्कन’ अमुरचा ससाणा (फाल्को अमूरेंसिस) चिनच्या पुर्वेस अमुर नावाच्या प्रदेशात वास्तव्य करणारा हा पक्षी दरवर्षी भारतातील उत्तर-पूर्वेकडील नागालँडमध्ये थांबून पुढे दक्षिण आफिकेच्या प्रवासाला निघत असतो. नागालँडमधील त्याच्या वास्तव्यादरम्यान मोठ्या प्रमाणात म्हणजे एकाच विभागात १,३०,००० ते १,४०,००० एवढे पक्षी एका वर्षी मारले जात होते.
पक्षी निरिक्षणासाठी तिथे गेलेल्या दोन पक्षी निरिक्षकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी त्याचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानंतर जगातील विविध पर्यावरण संस्थांनी नागालँडच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहून हा अघोरी प्रकार थांबविण्यासाठी विनंती केली.
नागालँडचे तत्कालीन मुख्यमंत्री नेफिऊ रियो यानी हे काम शासकीय यंत्रणेपासून तर धर्मसंस्था, शाळा या सर्वांना या पाहुण्या पक्षाला वाचविण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्व संस्था सक्रीय झाल्या. लोक जागृत झाले. २०१२ यावर्षी ही मोहीम सुरु करण्यात आली. आणि २०१३ मध्ये या पक्ष्याच्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आले. लोकांनी मनावर घेतले तर चमत्कार कसा होऊ शकतो याचे हे अप्रतिम उदाहरण म्हणता येईल.
आपल्याकडेही हिवाळ्यात पाणवठ्यावर, बागेत, शेतात, जंगलात अनेक लहान मोठे पक्षी स्थलांतर करतात. आपल्याकडच्या पाणवठ्यावर पावसाळा संपल्यानंतर किडे, किटक, अळ्या यांची संख्या वाढलेली असते. त्यावर पोट भरण्यासाठी लाखो पक्षी स्थलांतर करतात. परंतु आपल्याकडील पाणवठ्यांची अवस्था कमी होत आहे आणि त्याचा परिणाम स्थलांतरित पक्षांच्या संख्येवर होत आहे. तलावातील पाणवनस्पती कमी झाल्या आहेत.
तलावांच्या काठावरील गवत नष्ट होत आहे. तलावात बेशरम वनस्पती वाढत आहे. मध्यभारतातील तलावात गवतात चरणारे ‘वेडर्स’, काठावरील चिखलात चरणारे ‘बलिंगडक्क’ आणि खोल पाण्यात बुडी मारुन चरणारे ‘डायव्हींग डक्स’. याशिवाय बागेत, मोकळ्या जागेत अनेक पक्षी स्थलांतर करीत असतात.
हे पक्षी विविधप्रकारे पर्यावरणाचे संवर्धन करतात. सर्व सजिव एकमेकांशी संबंधित असतात. त्यामध्ये सुक्ष्म जीवांपासून मोठ्या वन्य प्राण्यांपर्यंत एकमेकांशी संबंध असल्यामुळे यातील एकही सजिव कमी झाला किंवा त्याच्या संख्येत घट आल्यास निसर्गाची साखळी तुटते. अनावश्यक जीव वाढू लागतात. आणि पर्यायाने पर्यावरणासोबतच मनुष्यजीवांचे नुकसान होते.
अशा स्थलांतरण करणाऱ्या पक्ष्यांना हा विस्तीर्ण प्रवास करताना विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. परंतु ज्याठिकाणी हे पक्षी वास्तव्याला येतात तिथेही ते सुरक्षित नाहीत. पाणवठ्यावरील स्थलांतरित पक्ष्यांच्या शिकारी होत असतात. अशा स्थलांतरित पक्ष्यांचे संरक्षण करून आपणही पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू शकतो.
- राजकमल जोब,
मानद वन्यजीव रक्षक भंडारा.