बळीराजाने गोधन काढले विक्रीला
By Admin | Updated: January 4, 2015 23:04 IST2015-01-04T23:04:52+5:302015-01-04T23:04:52+5:30
वर्षभर शेतीत राब-राब राबायचे... शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था व सावकारांकडून कर्ज घ्यायचे... मात्र, यावर्षी जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या

बळीराजाने गोधन काढले विक्रीला
दुष्काळाचे सावट
प्रशांत देसाई - भंडारा
वर्षभर शेतीत राब-राब राबायचे... शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था व सावकारांकडून कर्ज घ्यायचे... मात्र, यावर्षी जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यावर आर्थिक बोझा वाढत आहे. यामुळे कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांनी गोधन कवडीमोल भावात विकायला काढले आहे.
पशुपालकांचा सखा-सोबती असलेल्या ढवळ्या-पिवळ्याची जोडी असो वा गाय, म्हैस विक्री करताना त्यांचे डोळे पानावत असल्याचे चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळत आहे. धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना पुरते हतबल केले. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या दृष्टचक्रात शेतकरी व पशुपालक अडकला आहे. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली तो पुरता दबल्या गेला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेतल्या जाते. खरीप व रबी हंगामात धानाच्या पीकाची रोवणी होते. वर्षातून दोनदा होणाऱ्या धानापासून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहते. मात्र काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर निसर्ग कोपल्याने परिस्थिती हलाखीची झाली आहे.
परिस्थितीला समोरे जाता यावे, बँक, सावकार, बचत गट व हात उसणवारीच्या कर्जाची परतफेड करता यावी, यासाठी खरीप हंगामानंतर शेतकरी व पशुपालकांनी पशुधन विक्रीला बाजारात आणले आहेत. ज्या बैलांनी शेतकऱ्यांना शेतीच्या कामात पहाटेपासून रात्रीपर्यंत साथ दिली. गाय व म्हशींनी दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांच्या कुटूंबाचा आर्थिक भार आपल्या खांद्यावर उचलला. उन्ह, वारा व पाऊस यात शेतकऱ्याला सहकार्य केले. अशा पशुधनाला विक्रीला बाजारात नेण्याच्या कल्पनेनेच पशुपालकांचे उर भरून आले. मात्र त्यांच्याकडे नाईलाज आहे.
पशुधनाला विकले नाही, तर शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर वाढत जाईल. यात दबल्या गेलेल्या शेकऱ्यांना ते विकण्याशिवाय पर्याय उरले नाही. खरीप हंगाम झाला असून यात निसर्गाने त्यांना पुरते कर्जबाजारी केले आहे. शेतीतील धान पीक हातात येईल, अशी आशा त्यांची मावळली आहे. त्यामुळे दुसऱ्या हंगामाला आणखी सहा महिने अवकाश असल्याने वाढत्या कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी पशुपालकांनी पशुधनाला विक्रीचा निर्णय घेतला आहे.
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात रविवारी याच परिस्थितीचा फटका बसलेल्या अनेकांनी त्यांचे पशुधन विक्रीला आणले होते.
याबाबत जनावरे विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची मते जाणून घेतली असता, अनेकांनी दुष्काळाचा फटका बसल्याने कुटूंबाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचे सांगत त्यांनी अश्रुला वाट मोकळी करुन दिली. यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. आधुनिकतेमुळे सर्वत्र ट्रॅक्टरने नांगरणी व मळणी होते. त्यामुळे बैलांना काम उरले नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकटासोबत आधुनिकतेचे संकट वाढले आहे. यामुळे त्यांना आई समान गो मातेला विकावे लागत असल्याचे काहींनी सांगितले.