भंडारा तापला, पारा ४४ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:52+5:30
मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांना जाणवू लागला आहे. सोमवारी थोडेफार ढगाळ वातावरण असल्यानंतर मंगळवारपासून उष्णतेत वाढ जाणवू लागली. शुक्रवारी तापमानाने यावर्षीचा उच्चांक गाठला. मागीलवर्षी मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशाचा आकडा पार केला होता. उष्ण लहरींमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. शुक्रवारी भंडाराचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येत्या आठवड्याभरात तापमानात वाढ होण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तविली आहे. उल्लेखनीय म्हणजे २५ मे पासून नवतपाला प्रारंभ होत असल्याने उष्णतेतही वाढ होईल.
मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांना जाणवू लागला आहे. सोमवारी थोडेफार ढगाळ वातावरण असल्यानंतर मंगळवारपासून उष्णतेत वाढ जाणवू लागली. शुक्रवारी तापमानाने यावर्षीचा उच्चांक गाठला. मागीलवर्षी मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशाचा आकडा पार केला होता. उष्ण लहरींमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे दिसून येत आहे.
सध्या लॉकडाऊनकाळात शासनाने बाजारपेठेसाठी शिथिलता प्रदान केल्यामुळे सायंकाळ ५ वाजेपर्यंतच दुकाने सुरू असतात. अशा उष्णतेतही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. अशांना उष्णतेचा फटका जाणवू लागला आहे. दोन दिवसानंतर नवतपा सुरू होणार असून मे हीटचा दणकाही नागरिकांना बसणार आहे. वाढत्या उष्णतामानामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी उष्णतेपासून स्वत:चा बचाव करावा, असे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
२५ मे पासून नवतपा
२५ मे पासून रोहणी नक्षत्राची सुरूवात होत असून या नक्षत्रामध्ये सतत ९ दिवस सूर्यदेव आग ओकत असल्याने त्याला नवतपा या नावाने संबोधले जाते. या नवतपामध्ये शरीरातील उष्णतामान वाढून उष्माघाताचे नवे संकट निर्माण होऊ शकते. या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. उष्माघात हा आजार कोणालाही होवू शकतो.
मानवी शरीराचे समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, शारिरीक कमजोरी वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडपणा वाढणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खूप तहान लागणे, उलट्या होणे इत्यादी उष्माघाताची ही लक्षणे असून वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.