मरणोपरांत ‘आत्माराम’ पाहणार सुंदर जग
By Admin | Updated: October 29, 2016 03:24 IST2016-10-29T00:34:33+5:302016-10-29T03:24:05+5:30
‘मरावे परि कीर्ती रूपी उरावे’ अशी म्हण आपल्याकडे आहे. त्या ऐवजी आता ‘मरावे परि नेत्ररूपी उरावे’ असेच आता म्हणायला हवे.

मरणोपरांत ‘आत्माराम’ पाहणार सुंदर जग
समाजासमोर आदर्श : नेत्रदानाचा संकल्प काळाची गरज
भंडारा : ‘मरावे परि कीर्ती रूपी उरावे’ अशी म्हण आपल्याकडे आहे. त्या ऐवजी आता ‘मरावे परि नेत्ररूपी उरावे’ असेच आता म्हणायला हवे. याचा प्रत्यय जिल्हा सामान्य रूग्णालयात आला. आत्माराम लांजेवार यांनी मरणोपरांत नेत्रदान करून अवयवदान चळवळीच्या माध्यमातून मरणानंतरही हे सुंदर जग ते पाहणार आहेत. नेत्ररूपी उरण्याच्या त्यांच्या या कृतीमुळे गरजू अंध व्यक्तीला त्यांच्या डोळ्याने जग पाहण्याचे भाग्य लाभणार आहे.
मृत्युनंतर डोळ्याचा उपयोग दुसऱ्या अंध व्यक्तीला जग पाहण्यासाठी होत असेल तर दृष्टिची अमुल्य भेट देऊ या उद्दात्त हेतूने अंध व्यक्तीच्या जीवनातील अं:धकार दूर करण्याचे पवित्र काम भीमराव आत्माराम लांजेवार रा. झाडेगाव ता. साकोली यांनी आपल्या वडिलांचे आत्माराम लांजेवार यांचे मरणोपरांत नेत्रदान करून वडिलांना या जगात जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला.
आत्माराम नत्थूजी लांजेवार (७५) वर्ष हे झाडगाव येथील रहिवासी असून ते मोलमजूरीचे काम करत होते. रक्तदाबाच्या त्रासामुळे त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान २७ आॅक्टोंबरला रूग्णालयात त्यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांचा मुलगा भीमराव लांजेवार यांना नेत्रदानाची माहिती दिली असता नेत्रदान या महान कार्याकरीता ते तयार झाले.
भारतात दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक नेत्रपटलाची आवश्यकता असून सध्या केवळ ५० हजार नेत्रपटले नेत्रदानाद्वारे उपलब्ध होतात. भारतात दरवर्षी एक कोटीच्या जवळपास लोक या ना त्या कारणाने मृत्युमुखी पडतात. या सर्व मानवी मृतदेहांना अग्नी देऊन जमिनीत पुरून किंवा अन्यप्रकारे अंत्य संस्कार केले जाते.
मृतदेह नष्ट करताना मौल्यवान असे अंधाना दृष्टि देऊ शकणारे नेत्रही नष्ट केले जातात. आपले हे मौल्यवान डोळे इतरांच्या उपयोगी आणायचे असल्यास किंवा मृत्युनंतर अवयवदान करावयाचे असल्यास जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्रविभागात संपर्क साधता येऊ शकतो.
कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणांमुळे अंधत्व येऊ नये आणि जर आलेच तर अशा व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणे काळाची गरज असल्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते,
नेत्र शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मण फेगडकर यांनी केले आहे. यावेळी नेत्र चिकित्सा अधिकारी अजय आगाशे व शेंडे यांनी नेत्र संकलनाची प्रक्रिया पार पाडली असून समुपदेशनाचे कार्य सोनाली लांबट यांनी पार पाडले. (जिल्हा प्रतिनिधी)