बावनथडी प्रकल्प शाप की वरदान?
By Admin | Updated: July 25, 2016 00:43 IST2016-07-25T00:43:00+5:302016-07-25T00:43:00+5:30
सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा, याकरिता शासन विविध योजना अमलात आणत आहे

बावनथडी प्रकल्प शाप की वरदान?
शेतकऱ्यांचा प्रश्न : आष्टी कालव्याचे बांधकाम थंडबस्त्यात
राहुल भुतांगे तुमसर
सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा, याकरिता शासन विविध योजना अमलात आणत आहे. परंतु शासनाच्या अती दिरंगाई वृत्तीमुळे या योजना शेतकऱ्यांना अभिशाप ठरू लागल्या आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण आष्टी वितरिकेबाबद पहावयास मिळत आहेत.
तालुक्यातील अती महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बावनथडी परियोजनेची ओळख आहे. परियोजनेत गळभरणी करून पाणी साठवण्याची प्रक्रिया गत तीन चार वर्षापूर्वी सुरु आहे. परंतु राजापूर वितरिकेचे काम सन २००१ पासून सुरु होवूनही अद्याप काम अर्धवटच आहे. त्याच स्थितीत आहे. बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून राजापूर वितरिका ही लेंडेझरी, आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी (बुज.), लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, राजापूर आदी गावांना नहरावाटे सिंचनाकरिता पाणी वाटपाचे काम करणारी आहे. परंतु अजूनपर्यंत नहर खोदकाम व नहर बांधकाम झालेच नसल्याने लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा, चिखला, राजापूर येथील शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून तर वंचित आहेतच. त्या उपरही मागील सात वर्षापासून नहराकरिता जमीन अधिग्रहण केली. त्या जमिनीलगत ३ मिटर रुंदीच्या व ३ मिटर खोल खड्डे खोदून अधिकची जागा हस्तगत केल्या गेली आहे. पावसाळ्यात खड्यात पाणी साचल्याने शेतजमिनीचे भूस्खलन होणे सुरु आहे. त्यामुळे खड्याचे स्वरुप तर वाढलेच. परंतु ऊसाची शेतीही नष्ट होत आहे. यामध्ये आष्टी येथील शेतकरी मनीराम गौपाले, लक्ष्मण गौपाले, शत्रूघ्न गौपाले, रामप्रसाद गौपाले, श्रीराम मेश्राम, रुपचंद सोनवाने, शामराव झोळे आदी शेतकरी प्रभावित झाले आहेत. नहर गावाशेजारातून जात असल्यामुळे विभागामार्फत खड्डे खोदण्यात आले. या खड्यात गावातील छोटे मोठे मुलं पोहणे, खेळण्यासाठी उतरत असतात. तिथे कधीही जीवीत हानी होवू शकते. याकरिता खड्डे बुजविण्यात यावे,म्हणून विभागाचे अभियंता चौरागडे व नागपुरे यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु निवेदनाची साधी दखल घेण्याचे सौजन्यही विभागाने दाखविले नाही. उलट शेतकऱ्यांना कंत्राटदारामार्फत धमकावणे सुरुच आहे. लाभ, मोबदला देणे तर सोडाच शेतकऱ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने बावनथडी परियोजना आष्टीतील शेतकऱ्यांकरिता अभिशाप ठरू लागली आहे.