निराधार योजनेचा आधार हरविला
By Admin | Updated: June 14, 2014 23:21 IST2014-06-14T23:21:47+5:302014-06-14T23:21:47+5:30
शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ वाटप करण्यात मोहाडी तहसील कार्यालयाच्या मार्फत हयगय होत आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारे मानधन वाटपात घोळ सुरु आहे.

निराधार योजनेचा आधार हरविला
लाभार्थ्यांची थट्टा : आठ महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत
वरठी : शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ वाटप करण्यात मोहाडी तहसील कार्यालयाच्या मार्फत हयगय होत आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारे मानधन वाटपात घोळ सुरु आहे. वरठी येथील मानसिक रुग्ण रुचिका गजभिये हिला ८ महिन्यापासून मानधन मिळाले नाही. या संदर्भात ८ महिन्यापासून तिच्या पालकांना उडवाउडवीचे उत्तर तहसील कार्यालयाचे कर्मचारी देत असल्याची तक्रार कुंदा गजभिये यांनी केली आहे.
डॉ.आंबेडकर वॉर्ड वरठी येथे रुचिका गजभिये राहते. ती जन्मापासून मानसिक रुग्ण आहे. तिचे वडील सनफ्लॅग कंपनीत मजुरी करतात व आई घरकामस करते. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तिला ६०० रुपये प्रति म हिना मिळत होता. रूचिकाचा औषधाचा खर्चासह इतर बाबींवर हा खर्च व्हायचा. रुचिका मानसिक रुग्ण व अपंग असल्यामुळे ती पूर्णत: पालकांवर अवलंबून आहे. आठ महिन्यापासून तिला मिळणारी मदत मिळाली नाही. या संदर्भात कुंदा गजभिये यांनी मोहाडी तहसील कार्यालयात जावून वारंवार चौकशी केली. त्यांनी मागितलेले सर्व दस्तऐवज दोन तिनदा प्रत्यक्ष नेवून देण्यात आले. पण खात्यावर अजून पैसे जमा झाले नाही. अचानक पैसे बंद झाल्यामुळे त्यांच्यावर संकट आले आहे.
बँक व तहसील कार्यालय यांच्यात समन्वय नाही
शासनामार्फत मिळणारे सर्व मानधन हे खातेदाराच्या खात्यात परस्पर जमा होते. वरठी येथील लाभार्थ्यांना मिळणारा लाभ हा दोन वर्षापासून चिंतेचा विषय आहे. बँक कर्मचारी व तहसील कार्यालय यांच्यात समन्वय नाही. बँकेत चौकशी केली ते मोहाडीला पाठवतात व तहसील कार्यालयाचे कर्मचारी बँकेत पाठवतात. यात लाभार्थ्यांची दमछाक होते. संजय गांधी निराधार योजनेत निराधार पुरुष महिला यांच्यासह शारीरिक व मानसिक रुग्णाचा समावेश आहे. शासनाच्या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून अनेकांचा औषधाचा व इतर खर्च चालतो. त्यातही त्यांची होणारी थट्टा ही जीवघेणी ठरत आहे. (वार्ताहर)