बल्लारपूर पेपर मिल बंद होणार नाही
By Admin | Updated: March 30, 2015 00:47 IST2015-03-30T00:47:27+5:302015-03-30T00:47:27+5:30
येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लिमी. कंपनीला प्रदूषण करण्याच्या कारणावरुन संबंधित मंत्र्यांनी बंद करण्याचे आदेश दिले.

बल्लारपूर पेपर मिल बंद होणार नाही
बल्लारपूर: येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लिमी. कंपनीला प्रदूषण करण्याच्या कारणावरुन संबंधित मंत्र्यांनी बंद करण्याचे आदेश दिले. मात्र शहरातील कामगारांवर यामुळे संकट ओढावणार आहे. याचा विपरित परिणाम व्यापारी वर्गावरही होणार आहे. कोणत्याही परिस्थिती उद्योग बंद होऊ नये, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत ज्येष्ठ भाजपा नेते चंदनसिंह चंदेल यांनी दिली.
राज्यात भाजपासह महायुतीचे सरकार आहे. सरकारने प्रदूषण करणाऱ्या उद्योगावर बंदीचे हत्यार उपसले आहे. यात पेपर मिल उद्योगाचा समावेश आहे. या प्रकारामुळे कामगारात भितीचे वातावरण पसरले आहे. येथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन व्यथा मांडली. कामगारांना आश्वासन देताना, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत पेपर मिल बंद होऊ देणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
शहराची आर्थिक व्यवस्था बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लि. वर अवलंबून आहे. उद्योग बंद झाल्यास कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावणार आहे. प्रदूषण होत असल्याच्या कारणावरुन उद्योगाला टाळे लावले ही बाब योग्य नाही. दंडात्मक कारवाई त्यावर उपाय आहे. मात्र सरसकट उद्योग बंदीचा निर्णय कामगारांच्या जीवावर उठणार आहे.
येथील कामगारावर अन्याय होऊ देणार नाही, असेही पत्रपरिषदेतून सांगण्यात आले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्यासह अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, सतविंदर सिंहदारी, काशिनाथ सिंह, राजू गुंडेटी, विजयसिं ठाकूर यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)