बाबा कोरोनाने गेले, मेरे पास सिर्फ माँ है
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:45+5:302021-06-06T04:26:45+5:30
कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा भंडारा तालुक्यातील एका गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. वृद्ध आई, वडील तसेच ...

बाबा कोरोनाने गेले, मेरे पास सिर्फ माँ है
कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा
भंडारा तालुक्यातील एका गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. वृद्ध आई, वडील तसेच अन्य एका नातेवाइकाचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याच्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणाबरोबरच इतरही जबाबदारी पार पाडताना आता आईची कसरत होणार आहे. त्यामुळे घरातील कुटुंबकर्ता पुरुषच गेल्याने आता त्या कुटुंबाला शासनासोबतच समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे.
बॉक्स
कोरोनाकाळातही महिला बालविकास विभागाचे कार्य उल्लेखनीय
कोरोणाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक होती. यामध्ये भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एप्रिल महिन्यात घराबाहेर पडतानाही अंगावर काटा उभा राहत होता. मात्र अशाही परिस्थितीत कोरोनाने हिरावलेल्या आई-वडिलांची शोधमोहीम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आली. महिला व बाल विकास कार्यालयाचे कामकाज एप्रिल महिन्यातही सुरूच होते. त्यामुळे कोरोना काळातील महिला व बालविकास विभागातर्फे राबवलेल्या सर्वेक्षण मोहिमेतून जिल्ह्यात आतापर्यंत किती पालकांनी आपल्या आई-वडिलांना गमावले याचा शोध घेण्यात आला आहे. आजही याचे काम सुरूच आहे. त्यामुळे अशा बालकांची शोध मोहीम घेऊन त्यांना शासनाची मदत मिळवून दिली जाणार आहे.
बॉक्स
घरातील कर्ता पुरुषच गेल्याने संकट
कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरवलेली जिल्ह्यात ४५२ बालके आहेत. घरातील कर्ता पुरुषच निघून गेल्याने आता या कुटुंबांना उदरनिर्वाह करताना मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. बाबांचे अकाली निधन झाल्याने आता मुलाचे शिक्षण आणि कुटुंबाचा प्रपंच चालवायचा कसा असा प्रश्न काही महिलांना सतावत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी आता सरकार घेत असून शक्य तितकी मदत देण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
बॉक्स
पाच बालकांचे आईवडिलांचे छत्र हरवले
कोरोनामुळे आईवडील दोघांचाही मृत्यू झाल्याने पाच बालके ही निराधार झाली आहेत. आईवडील दोघांचा किंवा त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास त्या संदर्भात सर्वेक्षण जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच बालकांनी आई आणि वडील दोघांनाही गमावले आहे. तर ५० पालकांनी आपल्या आईला गमावले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४५२ बालकांनी आपल्या वडिलांना गमावले आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला असेल, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास शासनाच्या बालसंगोपन योजनेअंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाह्य केले जाणार आहे.