मार्चएण्डची येता वारी ताळेबंदाची घाई भारी
By Admin | Updated: March 28, 2015 00:33 IST2015-03-28T00:33:35+5:302015-03-28T00:33:35+5:30
आर्थिक वर्षअखेर असलेल्या मार्च महिन्याचा शेवट हा टेन्शन वाढविणारा असल्याने अनेकांची ताळेबंद पूर्ण करण्यासाठी आणि विवरणपत्रे सादर करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

मार्चएण्डची येता वारी ताळेबंदाची घाई भारी
भंडारा : आर्थिक वर्षअखेर असलेल्या मार्च महिन्याचा शेवट हा टेन्शन वाढविणारा असल्याने अनेकांची ताळेबंद पूर्ण करण्यासाठी आणि विवरणपत्रे सादर करण्यासाठी धावपळ सुरू आहे. वैयक्तिक करदात्यांची ही धावपळ सुरू असताना तिकडे ताळेबंद पूर्णत्वासाठी बँकांची कामेही थंडावली आहेत. ३१ मार्च हा आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस असतो. या दिवशी वर्षभरातील सर्व हिशेब पूर्ण करून त्यावर आधारित ताळेबंद तयार करायचे असते. जमा-खर्चाचा हिशेब करून संस्थेची वाटचाल स्पष्ट करणारी नफा तोटा पत्रके याच कालावधीत बनविली जातात. त्यासाठी आवश्यक लेखापरीक्षण आणि अकाऊंट तपासणीचे कामही आता अंतिम टप्प्यात असल्याने व्यावसायीकांची धावपळ वाढली आहे. (प्रतिनिधी)
अखर्चित निधीची काळजी
जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महसूल, बँका, प्राप्तीकर, विक्रीकर आदी सरकारी खात्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्च महिना मार्च करायला लावणारा ठरतो आहे. अनेक खात्यांना ३१ मार्चपूर्वी निधी खर्च करण्याची कसरत करावी लागत आहे. बहुतांश सरकारी खात्यांत उद्दिष्टपूवर्तींची धांदल उडाली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रक्त्दाब वाढण्यास सुरूवात झाली आहे.
उद्योजकांची धावपळ
उद्योजकांचीदेखील मार्च महिन्याच्या आॅर्डर ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची घाई आहे. मुदतीत मालाचा पुरवठा न झाल्यास अनेकांची नाराजी पत्करावी लागण्याची त्यांना भीती आहे. या महिन्यातच जीवघेणा उन्हाळा सुरू होईल. साहजिकच उत्पादन क्षमतेवरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे प्रयत्न आहेत.
व्यावसायिकांचा ताळेबंद
व्यावसायीकांसाठी मार्च महिना हा 'मार्च' करायला लावणारा आहे. आर्थि वर्षाची गणिते कशी जुळतील याचे काही जणांना टेन्शन आहे तर काहींना कर वाचविण्याची चिंता आहे. गुंतवणुकीवर करातून सवलत देणाऱ्या एजन्सी सरकारी असोत वा खासगी, सर्वांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्टपूर्ती झालीच पाहिजे, अशी सक्ती त्यांच्यावर करण्यात आली आहे.
टीडीएस आणि विवरणपत्र
३१ मार्चपूर्वी केलेल्या गुंतवणुकीची विवरणपत्रे प्राप्तीकर खात्या सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. विवरणपत्रे सादर केल्यानंतर कराच्या रूपाने कपात केलेला पैसा त्यांना परताव्याच्या माध्यमातून परत मिळणार आहे. मार्च महिन्यात आवश्यक असणारी गुंतवणूक न केल्यास कपात केलेली रक्कम त्यांना परत मिळणार नाही. टीडीएसच्या रूपात कपात झालेले पैसे परत मिळविण्यासाठी विवरणपत्र दाखल करावे लागणार आहे. मागील आर्थिक वर्षात विवरणपत्र दाखल न केलेल्यांना ३१ मार्चपूर्वी ते दाखल करण्याची धावपळ करावी लागत आहे. याशिवाय लेखापरीक्षण आणि हिशेब तपासणी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
बँका आणि कर सल्लागार कार्यालयात जादा काम
बँकांना त्यांचे हिशेब आर्थिक वर्ष अखेरीस पूर्ण करावयाचे असल्याने बँकेच्या नियमित वेळेव्यतिरिक्त रात्री उशिरापर्यंत थांबून कर्मचारी काम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे बँका रात्री उशिरापर्यंत सुरू दिसत आहेत. या कामावर देखरेख ठेवायचे काम करणारे कर सल्लागार आणि सनदी लेखापाल यांच्या कार्यालयातील कर्मचारीही दिवसरात्र काम करून त्यांच्या ग्राहकांचे हिशेब पूर्ण करण्याच्या कामात गुंतले असल्याने कार्यालयात धावपळ सुरू आहे. विवरपत्रे दाखल होत असल्याने आयकर कार्यालयामध्येही गजबजाट आहे.