विदेशी ‘घनवर बाड्यांचे’ आगमन
By Admin | Updated: December 21, 2015 00:35 IST2015-12-21T00:35:19+5:302015-12-21T00:35:19+5:30
महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्याच्या या भूभागात अनेक वर्षापासून विदेशी पक्षी हिवाळ्यात आपली हजेरी लावतात.

विदेशी ‘घनवर बाड्यांचे’ आगमन
शरद ऋतूत पक्ष्यांची किलबिल : तीन महिने राहणार वास्तव्य
साकोली : महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्याच्या या भूभागात अनेक वर्षापासून विदेशी पक्षी हिवाळ्यात आपली हजेरी लावतात. या विदेशी पक्ष्यांत घनवर, सरगबाड्डा, खैराबाड्डा, अरुणबाड्डा, चिमणशेंद्र्या, चक्रवाक, कलहंस इत्यादी पक्षांचा समावेश होतो. हे पक्षी सैबेरिया, मंगोलिया, युरोप, लडाख व कझाकस्थानच्या उत्तर भागातून भारत भूखंडात दरवर्षी येतात.
त्या भागात हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे पक्ष्यांना चाऱ्याची समस्या निर्माण होते. भारत हा देश समशितोष्ण हवामानात येत असल्यामुळे येथील तापमान विदेशी पक्ष्यांना पोषक असते.
धोके जास्त - पक्षी असुरक्षित
हे विदेशी पक्षी हजारो कि.मी.चा प्रवास करून भारतात येतात. जलाशयात थव्याथव्यानिशी रात्रंदिवस वास्तव्य करतात.
तळ्यातील गादगवत, वनस्पतींचे कोंब, बारीक मासे, झिंगे, शिंपल्यातील मऊ प्राणी यावर आपली उपजीविका करतात. तलाव भागातील जमिनीवर अतिक्रमण झाल्यामुळे आणि लपून शिकार होत असल्यामुळे हे विदेशी पक्षी असुरक्षित असल्याचे अरण्ययात्रा पुस्तकाचे लेखक, विनोद भोवते यांनी लोकमतला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)