कृषी विभाग झाला ‘पंगू’
By Admin | Updated: January 12, 2015 22:45 IST2015-01-12T22:45:56+5:302015-01-12T22:45:56+5:30
येथील पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या संपूर्ण शेतकरी हिताच्या महत्वपूर्ण योजना तालुका कृषि विभागाकडे शासनाने वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कृषी विभाग झाला ‘पंगू’
लाखांदूर : येथील पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या संपूर्ण शेतकरी हिताच्या महत्वपूर्ण योजना तालुका कृषि विभागाकडे शासनाने वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांच्या लाभाच्या अनेक महत्वपूर्ण योजना यापूर्वी राबविल्या जात होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व योजनांचा लाभ मिळत होता. पंरतु शासनाने यात मोठे बदल घडवून आणून पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या कृषि अभियांत्रीकीकरण योजना, राज्य पुरस्कृत अभियांत्रिकीकरण योजना, कडधान्य विकास कार्यक्रम योजना, गळीत धान्य विकास कार्यक्रम योजना व इतर योजना ह्या तालुका कृषि विभागाकडे वळविण्यात आल्या. यातून बियाणे वाटप, शेती उपयोगी औजारे वाटप, ताडपत्री वाटप तसेच शेतपिकांसदर्भात अनेक महत्वाच्या योजना वर्ग करण्यात आले आहेत. आता पंचायत समिती कृषि विभागाकडे कुठलेच महत्वाचे कृषि विषयक काम उरले नसल्याने कृषि विभाग पंगू झाल्याचे दिसत आहे.
तालुका कृषि विभागाकडे यापूर्वी शेतकऱ्यांसदर्भात कुठल्याच प्रकारच्या योजना वा संबंध येत नसल्याने हा विभाग शेतकऱ्यांपासून अलिप्त मानल्या जात होता. आता सर्व कृषि विषयक योजना या विभागाकडे देण्यात आल्या असल्या तरी शेतकरी वर्गात तिव्र नाराजी पसरली आहे. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषि विभागाकडेच त्या योजना पूर्ववत कायम ठेवण्याची मागणी केली आहे. अप्पर आयुक्त विस्तार कृषि विभाग भारत सरकार दिल्ली यांनी नुकतीच लाखांदूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात कृषि विषयक आढावा बैठक घेतली. यावेळी आत्मा संघटनेचे सदस्य तथा शेतकरी भाऊ रामटेके यांनी अप्पर आयुक्तांसमोर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. पंचायत समिती कृषि विभागाकडे योजना पूर्ववत करण्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी सुध्दा पाठिंबा देऊन मागणी रेटून धरली होती. (तालुका प्रतिनिधी)