मृत्यूनंतरही ‘शिल्पा’च्या मृतदेहाची फरफट
By Admin | Updated: February 22, 2015 00:30 IST2015-02-22T00:30:51+5:302015-02-22T00:30:51+5:30
शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मृत्युमुखी पडलेल्या शिल्पाच्या मृतदेहावर अंत्यसंकारासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला. दरम्यान, शिल्पाच्या मृतदेहाला अंत्यविधी ...

मृत्यूनंतरही ‘शिल्पा’च्या मृतदेहाची फरफट
प्रशांत देसाई भंडारा
शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मृत्युमुखी पडलेल्या शिल्पाच्या मृतदेहावर अंत्यसंकारासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला. दरम्यान, शिल्पाच्या मृतदेहाला अंत्यविधी स्थळापर्यंत पोचण्यासाठी पवनी ते भंडारा आणि भंडारा ते पवनी असा चार वेळा प्रवास करावा लागला.
वलनी येथील शिल्पा जांभुळकरचा शुक्रवारी सकाळी निर्दयपणे खून झाला होता. पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त जमावाने मृतदेह सहा तास उचलला नाही. शवविच्छेदनासाठी भंडारा व येथून वलनी अशा चार फेऱ्या मृतदेहाला घालाव्या लागल्या. अंत्यसंस्कारासाठी या मृतदेहाला २०० कि़मी. चा प्रवास करावा लागल्याने मेंदूच्या झिणझिण्या उडाल्या.
आसगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या शिल्पावर गावातीलच देवा गभनेने कोयत्याने हल्ला करून हत्या केली. याची माहिती होताच मृतकाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून पोलीस प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. पवनी पोलिसांनी या प्रकरणाची वेळीच दखल घेतली असती तर शिल्पा हत्याकांड घडले नसते, असा आरोप नातेवाईकांनी करून एसडीपीओ, पोलीस निरीक्षक व दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली. निलंबन होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतल्याने सहा तास मृतदेह घटनास्थळावर पळून होता. घटनेला काही राजकीय पक्षानी वळण देवून नातेवाईकांच्या भावना रेटून धरल्या. पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन मृतदेह शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उत्तरीय तपासणीकरिता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला.
येथे शिवसैनिकांनी शिल्पाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली. तणावाच्या परिस्थितीत पोलीस बंदोबस्तात शिल्पाचे रात्री शवविच्छेदन करण्यात आले. रात्री १० वाजताच्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात शिल्पाचा मृतदेह वलनी येथे नेला. मात्र गावकऱ्यांमध्ये असलेला असंतोष बघून पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मृतदेह पून्हा भंडाऱ्याला आणला. सकाळपासून रात्रीपर्यंत शिल्पाच्या मृत्युनंतरही तिच्या मृतदेहाचीही अवहेलना सुरूच होती. आज सकाळपासून ग्रामस्थ व नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी रेटून धरत खैरी चौरस्ता रोखून धरला. अशास्थितीत शिल्पाचा मृतदेह भंडारा सामान्य रुग्णालयातील शवगृहात पडून होता.
वलनी फाट्यावर रास्तारोको करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रण पथकाला चौरस्त्यावर तैनात केले होते. जिल्हा अधिक्षक कैलास कणसे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळ गाठून मृतकाच्या नातेवाईकाला व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
सायंकाळी तणाव निवळल्यानंतर मृतदेह भंडारा येथून वलनी येथे नेण्यात आला व सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तणावपूर्ण स्थितीत व शोकाकूल वातावरणात तिच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवनी ते भंडारा व भंडारा ते पवनी मार्गे वलनी असा २०० कि़मी.चा चार फेऱ्यांचा प्रवास केल्यानंतर तब्बल २४ तासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.