प्रवेशासाठी लागणार नाही ‘शपथपत्र’

By Admin | Updated: March 28, 2016 00:34 IST2016-03-28T00:34:03+5:302016-03-28T00:34:03+5:30

महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी शपथपत्र तयार करून घेण्यामध्ये पालकांचा वेळ जात होता.

'Affidavit' will not be required for admission | प्रवेशासाठी लागणार नाही ‘शपथपत्र’

प्रवेशासाठी लागणार नाही ‘शपथपत्र’

शासन निर्णय : शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिलासा
भंडारा : महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी शपथपत्र तयार करून घेण्यामध्ये पालकांचा वेळ जात होता. सेतू कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या तर शपथपत्र, स्वघोषणापत्र व साक्षांकित प्रती जोडल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश होत नव्हते. आता शासनाने १० फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निणर्यानुसार स्वयंसाक्षांकित प्रती महाविद्यालयांना स्वीकाराव्या लागणार आहेत. त्यामुळे पालकांचा ताणही कमी होणार आहे.
शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये विविध दाखले अनुज्ञप्ती व इतर शासकीय सुविधा प्राप्त करून घेण्याकरिता नागरिकांना शपथपत्र तसेच मूळ प्रमाणपत्रांच्या राजपत्रीत अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी सक्षम अधिकाऱ्याद्वारे साक्षांकीत प्रती सादर कराव्या लागत होत्या. परिणामी नागरिकांची गैरसोय होत होती. गैरसोय दूर करण्याकरिता प्रचलित कार्यपध्दती अधिक सुलभ करण्याचा निर्णय शसानाने घेतला. शपथपत्राऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकृत करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागातच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

फलकावर माहिती
नागरिक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी, पालकांना कोणत्या बाबींसाठी अर्जासोबत शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे. कोणत्या बाबींसाठी अर्जासोबत शपथपत्र बंधनकारक नाही. याची यादी तयार करून संबंधित कार्यालय, शैक्षणिक संस्थांमधील फलकांवर लावावी लागणार आहे.

गर्दी आटोक्यात येणार
महाविद्यालयांच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर तहसील कार्यालयातील सेतूसमोर गर्दी होत होती. त्यांना प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी पालकांसोबत तहसीलच्या चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी व्हायची ती आता या सुविधेमुळे आटोक्यात येईल.

Web Title: 'Affidavit' will not be required for admission