सातही ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ‘आॅक्सिजन’वर
By Admin | Updated: January 4, 2015 23:06 IST2015-01-04T23:06:43+5:302015-01-04T23:06:43+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपचारासाठी सात ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांची स्थापना करण्यात आली. मात्र या ठिकाणी मुलभूत सोयीसुविधांचा अभाव

सातही ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ‘आॅक्सिजन’वर
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपचारासाठी सात ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांची स्थापना करण्यात आली. मात्र या ठिकाणी मुलभूत सोयीसुविधांचा अभाव व अधिकारी, कर्मचाऱ्यांची ५३ पदे रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. परिणामी रुग्णांना रेफर टू भंडारा पाठविण्यात येते. सातही ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी वर्ग १ ची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहे, हे मात्र विशेष.
ग्रामीण रुग्णालयात असलेल्या रिक्त पदामुळे रुग्णालये आॅक्सिजनवर असल्याची स्थिती आहे. मोठ्या आशेने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शेवटी त्यांना खासगी डॉक्टरांची सेवा घेतल्याशिवाय मार्ग नसतो.याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
भंडारा जिल्ह्यात पवनी, लाखांदूर, मोहाडी, लाखनी सिहोरा, अड्याळ व पालांदूर येथे ग्रामीण रुग्णालय आहेत. ग्रामीण रुग्णालय परिसरातील ८० हजार गरीब व सामान्य परिवारातील नागरिक या रुग्णालयांवर आश्रीत आहेत. ८० हजार नागरिकांचा थेट संबंध ग्रामीण रुग्णालयांशी येतो. काही रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सफाई कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे त्यांच्या कामाचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे दररोज बाहेरुन येणाऱ्या रुग्णांना तपासून घेण्यात कमालिची कसरत करावी लागते. काही रुग्णालयात प्रशिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे शस्त्रक्रिया कक्ष असून नसल्यासारखा विनाकामाचा ठरत आहे. या कक्षाचा उपयोग कधी कधी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी केले जाते. ग्रामीण रुग्णालयांतून नेहमी ‘रेफर टू भंडारा’ हेच वाक्य रुग्णांच्या कानी पडते.
ग्रामीण भागातून पाठविण्यात आलेल्या रुग्णांना व गरोदर महिलेला भंडाऱ्याच्या रुग्णालयात पाठविण्यात येत असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा जिल्ह्यातील सात ग्रामीण रुग्णालयासाठी १९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५२ पदे रिक्त असून १४२ पदे भरलेली आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांमुळे कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे़ यामुळे त्यांच्यात अंतर्गत कलह निर्माण होतात़ त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे़ याचा फटका रुग्णांना बसतो़ (नगर प्रतिनिधी)