आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: June 23, 2015 01:13 IST2015-06-23T01:13:54+5:302015-06-23T01:13:54+5:30

पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे नागरिकांना निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागू नये,

Admin system ready for disaster management | आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज

आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज

जिल्हा, तालुका समिती स्थापन : नियंत्रण कक्ष २४ तास सेवेत
भंडारा : पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे नागरिकांना निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षासह सातही तालुक्यात समिती स्थापन करून अत्याधुनिक यंत्रसामुग्री व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
भंडारा जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. अतिवृष्टीमुळे नदी, नाला काठावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना याचा दरवर्षी मोठा फटका बसतो. यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. नागरिकांना नुकसानीचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या नेतृत्वात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती सज्ज झाली आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील समितीत सहा व्यक्तींसह दोन बोट चालकांचा समावेश आहे. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नेतृत्वात समिती काम करणार आहे. या समितीत तीन होमगार्ड व गोताखोरांचे पथक राहणार आहे. या समितीत २० जणांचा समावेश आहे.
नागरिकांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून परिस्थितीचा सामना करण्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्ती निवारण्याच्या दृष्टिने मॉलड्रिल घेऊन उपाय योजनेसंदर्भात आढावा घेण्यात आला आहे.
नदीमुळे बसू शकतो फटका
वैनगंगा नदीचे पात्र मोठे असून वैनगंगा नदीसह कन्हान, सूर, बावनथडी, चुलबंद नदीमुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना अतिवृष्टीचा फटका बसू शकतो. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या जिल्ह्यातील १५४ गावातील नागरिकांना धोका पोहचू शकतो. (शहर प्रतिनिधी)

मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी
पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडतो. अशावेळी निसर्गाच्या अवकृपेमुळे अनेकांवर संकट कोसळते. त्याची माहिती शासनापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्थ तलाठ्यांकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थान समितीकडे वेळोवेळी अहवाल सादर करावयाचा आहे.
२४ तास नियंत्रण कक्ष
पावसामुळे नागरिकांना निर्माण होणाऱ्या आपत्तीवर मात करता यावी, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. या कक्षात कर्मचाऱ्यांची २४ तास नेमणूक करण्यात आलेली आहे. अडचणीसंदर्भात कक्षातील (०७१८४-२५१२२२) या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
अशा आहेत उपलब्ध सुविधा
यांत्रिकी फायबर बोट ०९, रबर बोट ०१, लाईफ बॉईज ५९, लाईफ जॅकेट ६०, हेल्मेट २५, हेल्मेट विथ टॉर्च ०८, इमरजन्सी लाईट १०, अ‍ॅल्यूमिनिअम फोल्डींग स्ट्रेचर ०८, फोल्डींग तंबू ०९, फोल्डींग स्ट्रेचर ०५, सर्च लाईट ०६, इनफ्लॉन्ट टेबल इमरजन्सी लाईट ०८ आहेत.

Web Title: Admin system ready for disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.