कुणाच्या मते सक्षम तर कुणी म्हणतो खायीत लोटणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:24+5:302021-02-05T08:39:24+5:30

देशात सक्षम व्यवस्था कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात एक लाख ३१ हजार कोटी ओतण्यात आले. तर रेल्वेसाठी एक लाख १० ...

According to some, it is a competent budget | कुणाच्या मते सक्षम तर कुणी म्हणतो खायीत लोटणारा अर्थसंकल्प

कुणाच्या मते सक्षम तर कुणी म्हणतो खायीत लोटणारा अर्थसंकल्प

देशात सक्षम व्यवस्था

कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात एक लाख ३१ हजार कोटी ओतण्यात आले. तर रेल्वेसाठी एक लाख १० हजार कोटी व मूलभूत सुविधांसाठी एक लाख १८ हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळेच देशात सक्षम व्यवस्था निर्माण होणार आहे. यासह सक्षम आरोग्य व्यवस्थाही उभी ठाकली आहे. आत्मनिर्भर भारताला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे.

- सुनील मेंढे, खासदार, भंडारा.

लोकाभिमुख अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात कृषी, रस्ते, रेल्वे, मेट्रो यासह गावांसाठी कल्याणकारी योजनांवर भरीव तरतूद करण्यात आली आहे. वित्तीय तूट कमी करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. ग्रामीण सुधारणांचा हा प्रयत्न आहे. विकासाचा दर उंचावणारा व सर्व क्षेत्राला संतुलित, प्रगतीसाठी चालना देणारा असा हा अर्थसंकल्प असून लोकाभिमुख आहे.

- डॉ. परिणय फुके, आमदार

विकासाकडे नेणारा

ग्रामीण क्षेत्र निर्माणअंतर्गत ४० हजार कोटी, ॲग्रो क्रेडिटसाठी १६.५ लाख कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिला आता ठरलेल्या मजुरीवर शेड्युलमध्ये काम करू शकतील. कोरोना व्हायरससाठी निधीची सोय आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेले आजचे बजेट सर्वसामान्यांसह भारतीयांना विकासाकडे घेऊन जाणारे आहे.

- चरण वाघमारे, माजी आमदार

विश्वासदर्शक बजेट

लोकसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प निश्चितपणे विकासाकडे घेऊन जाणारा आहे. आरोग्य, शेती, महामार्ग निर्मिती यावर भरीव तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना कर रिटर्न भरण्यातून सूट देण्यात आली आहे. तसेच कर स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. अर्थमंत्र्यांनी सादर केलेले हे बजेट खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी विश्वासदर्शक आहे.

- मुकेश थानथराटे, महामंत्री भाजप

देश विकणारे बजेट

खासगीकरणाअंतर्गत शासकीय कंपन्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पेट्रोल व डिझेलवर कृषीसेस अंतर्गत वाढ झाल्याने हमखासपणे महागाई वाढणार आहे. तरुणांसाठी तथ्यहीन असा हा अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारने हा अर्थसंकल्प सादर करून देश विकण्याकडे वाटचाल सुरू केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

- मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

देशाला अधोगतीकडे नेणारा

वित्तमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारा आहे. केंद्र सरकार राज्याचे ३८ हजार कोटी जीएसटी देणे बाकी आहे. ते सोडून केंद्र सरकार निवडणूक होणाऱ्या राज्यांवर खैरात वाटत आहे. राजकीय हेतू समोर ठेवून हे बजेट सादर केले असून, देशाला अधोगतीकडे नेणारे ठरणार आहे.

- गौरीशंकर मोटघरे, महासचिव काँग्रेस.

कंबरडे मोडणारे बजेट

मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महागाई वाढीला चालना देणारे असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे. सर्वच क्षेत्रांत सर्वांचीच निराशा झाली आहे. लोकाभिमुखपेक्षा स्वहित असे हे बजेट आहे.

- नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष रा. काँ.

Web Title: According to some, it is a competent budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.