अबब... भटईची एक रुपये किलो दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:01:12+5:30
लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्यात शेतकरी भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र लाखनीसह भंडारा बाजारात शेतकऱ्यांना भटई वांगे केवळ एक रुपया किलो दराने विक्री करण्याची वेळ आली. उन्हाळ्यात असणारे लग्न समारंभ, धार्मीक कार्यक्रम बंद झाल्याने वांग्याची मागणी घटली आहे. अतिशय चविष्ट व काळसर जांभळ्या रंगाच्या या वांग्याला मोठी मागणी असते.
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत चालल्याने राज्यात चौथा लॉकडाऊन सुरु झाला आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्याने शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्याबाहेर होेणारी मालवाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला बाहेर निर्यात होणे बंद झाले आहे. याचा फटका भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांना बसत आहे.
लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्यात शेतकरी भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र लाखनीसह भंडारा बाजारात शेतकऱ्यांना भटई वांगे केवळ एक रुपया किलो दराने विक्री करण्याची वेळ आली. उन्हाळ्यात असणारे लग्न समारंभ, धार्मीक कार्यक्रम बंद झाल्याने वांग्याची मागणी घटली आहे. अतिशय चविष्ट व काळसर जांभळ्या रंगाच्या या वांग्याला मोठी मागणी असते. या भटई वांग्याचे एक वैशिष्ट म्हणजे अतिशय आकर्षक असल्याने ग्राहकांची मागणी असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात भटई वांग्याची लागवड तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातील अनेक शेतकरी करतात. लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादकांमध्ये मोठे संकट उभे राहिले आहे.
मागणीअभावी शेतकऱ्यांना भाव मिळेनासा झाला. ठोक व्यापारी शेतकऱ्यांकडून एक ते चार रुपये इतक्या अल्पदराने वांग्याची मागणी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दराने भाजीपाला विकावा लागत आहे.
भटई वांगे तोडणीसाठी १२० रुपये मजुरांना मजुरी द्यावी लागते.
शेतकऱ्याला तोडणी करणे, औषध फवारणी, निंदणी, लागवड खर्च, मशागतीचा खर्च, बिजायतीचा खर्च पकडला असता लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.
तालुक्यातील लाखनी, लाखोरी, सावरी, सोमलवाडा अशा अनेक गावांमध्ये भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भेंडी, चवळी, शेंगा, पालक उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी कवडीमोल दराने भाजीपाला विक्री करीत असल्याने चिंतेत आहे.
दर नसल्याने शेतकऱ्याला नैराश्य येत असून शेतकरी आपल्या गुरांना भाजीपाला टाकत असल्याचे चित्र तालुक्यातील अनेक शेतशिवारात दिसून येत आहे.
शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी. कोरोना संकटामुळे शेतकºयांना मोठे संकट कोसळले असून शासनाच्या मदतीशिवाय शेतकरी उभा राहू शकणार नाही.
-पुनेश्वर सिंगनजुडे,
उपसरपंच लाखोरी.