आष्टी रेतीघाटावर बेसुमार उपसा
By Admin | Updated: July 30, 2015 00:42 IST2015-07-30T00:42:22+5:302015-07-30T00:42:22+5:30
रेतीघाट लिलावात पारदर्शकता ठेवून अनधिकृत उपसा व चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी, रायल्टीची कपात होत नसल्याने ...

आष्टी रेतीघाटावर बेसुमार उपसा
रॉयल्टी कपात नाही : सीमांकित बाहेर उपसा, एसएमएसमध्ये घोळ
चुल्हाड (सिहोरा) : रेतीघाट लिलावात पारदर्शकता ठेवून अनधिकृत उपसा व चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी, रायल्टीची कपात होत नसल्याने आष्टीच्या रेती घाटाविषयी शंकाकुशंकांना पेव फुटले आहे.
जिल्हाभरात रेती घाटाचे लिलाव आॅनलाईन प्रक्रियेने करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशानाने महसूल प्राप्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा क्रियान्वीत केली आहे. परंतु या प्रक्रियेत कंत्राटदारांनी नवा फंडा शोधून काढला आहे. रेतीघाट लिलावात सिमांकित क्षेत्र ओलांडून अनधिकृत उपसा खुद्द कंत्राटदार करीत आहे. यात तलाठी तसा अधिनस्थ यंत्रणेसोबत साटेलोटे असल्याचे धक्कादायक माहिती पुढे येत आहे. एका घाटावर रेतीला रायल्टीचा एसएमएस भलत्याच रेती घाटाचा देण्यात येत आहे. हा घोळ शोधण्यासाठी 'लोकमत'ने ४ रेतीघाटांना प्रत्यक्षात भेट दिली असता चक्रावून सोडणारी माहिती दिसून आलीे. मध्यप्रदेश राज्याच्या सिमेलगत भंडारा जिल्हा प्रशासनाने तुमसर तालुक्यात आष्टी आंजनविहीरी या रेतीघाटाला मंजुरी दिली आहे.
बावनथडी नदीघाट हा रेतीघाट आहे. पावसाळ्यात नदी पात्रात पाणी राहत नसल्याने या घाटाला याच कालावधीत महत्व प्राप्त होत आहे. या पात्रातील रेती मध्यप्रदेशातील शहरात पोहचती करण्यात येत आहे. दरम्यान आष्टीच्या रेतीघाट मालकांना मे महिन्यात ३,५०० ब्रास रेतीचा उपसा करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता ७५० रायल्टी वितरित करण्यात आले असून, गेल्या अडीच महिन्यांपासून या घाटावरील रायल्टी खर्च करण्यात आली नाही, अशी माहिती मिळाली आहे. या शिवाय रेती घाटावरून १० हजारांहून अधिक ब्रास रेतीचा उपसा करण्यात आलेला आहे. सिमांकित क्षेत्र बाहेर या घाटाने रेषा ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात दिवस-रात्र धुळफेक सुरू असताना पारदर्शकता शाबूत ठेवण्यात येत आहे. प्रत्यक्षात आष्टीच्या रेतीला अन्य रेती घाटांची रायल्टी कां, असा शोध मोहिमेत निदर्शनास आले आहे. बावनथडी नदी पात्रातील रेतीची आयात राज्यात होत नाही. मध्यप्रदेशात निर्यात केली जात आहे. परंतु रायल्टी खर्च होत नसल्याने संपूर्ण घाटावर गडबड झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. या माहितीपासून जिल्हा प्रशासन अनभिज्ञ असल्याचे कळले आहे. पावसाळ्यात अवाढव्य दराने रेतीची विक्री करण्यासाठी रेती माफियांनी नवा फंडा शोधून काढला आहे. रायल्टीची उसनवार सुरू करण्यात आल्याने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. नाकाडोंगरी गावानजीक मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या आंतरराज्यीय पुलाला अवाढव्य रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने धोका निर्माण झाला आहे. तरीही कंत्राटदार म्हणतो, या घाटावरून रेतीचा उपसा होत नाही. (वार्ताहर)