८९ टक्के पेरणी खोळंबली
By Admin | Updated: July 12, 2015 00:41 IST2015-07-12T00:41:42+5:302015-07-12T00:41:42+5:30
पहिल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाने खरीप हंगामासाठी पऱ्हे व सोयाबीन तथा अन्य कडधान्याची पेरणी आटोपती घेतली.

८९ टक्के पेरणी खोळंबली
रोवणी केवळ ०.३१ टक्के : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
भंडारा : पहिल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाने खरीप हंगामासाठी पऱ्हे व सोयाबीन तथा अन्य कडधान्याची पेरणी आटोपती घेतली. मात्र, त्यानंतर १५ दिवसापासून पावसाने दडी मारली. यामुळे अनेकांची पऱ्हे करण्याच्या मार्गावर तर पेरणीची बियाणे मातीत गडप झाली. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट उभे राहिले. गुरूवारी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाच्या विलंबाने जिल्ह्यात रोवणी केवळ ०.३१ टक्के आटोपली असून पेरणी ११ टक्केच पार पडल्याचे वास्तव आहे.
१ जून ते ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ३१० मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. जूनच्या मध्यान्हापासून वरूणराजा गायब झाले. तत्पूर्वी पहिल्या पावसाच्या जोरदार आगमनानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक पेरणी व आवत्या, रोवणी केली. मात्र, त्यानंतर सुमारे पंधरा दिवस पावसाने दडी मारली. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांनी रोवण्यांसह पेरणीही आटोपली. परंतू सिंचनाची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पऱ्हे वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान पाऊस नसल्याने पेरणी व रोवणी खोळंबली.
जिल्ह्यात धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १,८१,५९१ हेक्टर निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी भात नर्सरी १५,६९१.८० हेक्टर क्षेत्र, आवत्या ८,६८५ हेक्टर, रोवणी ५१६.३० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे. भात पिकाची पेरणी ९,२०१.३० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आलेली आहे. सर्वसाधारण क्षेत्राचा विचार केल्यास जिल्ह्यात केवळ ५.०६७ टक्केच भात लागवड आटोपली असून सुमारे १,७२,३८.९७ हेक्टर क्षेत्रात म्हणजेच ९४.९३३ टक्के क्षेत्रातील भात लागवड खोळंबली आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ०.३१ टक्के क्षेत्रात रोवणी झाली आहे. सोयाबीनसह अन्य कडधान्य पिकांसाठी कृषी विभागाने १,९८,६३९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले. त्यापैकी २२,३३०.२५ हेक्टर क्षेत्रात म्हणजे केवळ ११.२४ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.
धान पिकाखेरीज जिल्ह्यात तूर, मुंग, उडीद हे कडधान्य, भुईमुंग, खरीप तीळ, सोयाबीन हे तेलबिया पीक, हळद, अद्रक, मिरची, भाजीपाला, ऊस आदी पिकांचीही लागवड जिल्ह्यात होते. धान पिकानंतर सोयाबीन व तुर पिकांची लागवडचे क्षेत्र आहे.
भंडारा जिल्ह्यात तुर पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८,२५० हेक्टर तर सोयाबीनचे ८,००६ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. यापैकी तूर ६,०७४ हेक्टरमध्ये तर सोयाबीन १,५९५ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आलेली आहे. तुर पिकाची २६.४ टक्के तर सोयाबीनची ८०.१ टक्के पेरणी अद्याप खोळंबली आहे. (शहर प्रतिनिधी)