६९३ गावांना टंचाईसदृश्य परिस्थितीतून वगळले
By Admin | Updated: January 15, 2015 22:45 IST2015-01-15T22:45:06+5:302015-01-15T22:45:06+5:30
धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केली आहे.

६९३ गावांना टंचाईसदृश्य परिस्थितीतून वगळले
देवानंद नंदेश्वर - भंडारा
धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केली आहे. यात १५४ गावांची ५० पैसेपेक्षा कमी तर ६९३ गावांची ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ६९३ गावातील शेतकऱ्यांना टंचाईसदृश्य स्थितीतून वगळले आहे. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना सवलतींचा लाभ मिळणार नाही.
खरीप हंगामात धानाचे उत्पादन कमालिचे घटल्याने शेतकऱ्यांवर बिकट परीस्थिती ओढावली आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत ६९३ गावातील पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा प्रशासनाने ८४७ गावांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे दर्शविली आहे. यातील १५४ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ६९३ गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.
भंडारा तालुक्यातील १७० गावांची पैसेवारी ६० पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ६० पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ५९ पैसे, पवनी तालुक्यातील १५१ गावांची पैसेवारी ५१ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५९ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ५४ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ५१ पैसे दाखविण्यात आली आहे. यातील १० गावे अकृषक पाण्याखालील पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर केली नाही.
यामध्ये पवनी तालुक्यातील १० गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८७८ एकूण गावांपैकी ८४७ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. पवनी तालुक्यातील १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत. यापैकी ८४७ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. यात ६९३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी जिल्हा प्रशासनाने धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही अंतिम आणेवारी ५६ पैसे दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे़
१५४ गावांना मिळणार लाभ
जिल्ह्यातील १५४ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. यात भंडारा तालुक्यातील एक, मोहाडी तालुक्यातील २४, तुमसर ९, पवनी ४८, लाखांदूर ३४, लाखनी ३८, तर साकोली तालुका निरंक दाखविण्यात आला आहे. १५४ गावे टंचाई सदृश्य परिस्थतीत असल्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, दहावी व बारावी परिक्षेचे शुल्क माफ, रोहयो अंतर्गत निकषात शिथीलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी टँकरने पुरविणे, कृषीपंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत.