६३ प्रकल्पात केवळ १३ टक्के जलसाठा
By Admin | Updated: January 3, 2015 22:56 IST2015-01-03T22:56:35+5:302015-01-03T22:56:35+5:30
जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण

६३ प्रकल्पात केवळ १३ टक्के जलसाठा
जलस्तर घटला : वैनगंगा नदीपात्रात मुबलक जलसाठा
भंडारा : जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १३़५१ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ५३.५१ टक्क्यानी घट झालेली आहे.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ९़८८, बघेडा १२़ ०५, बेटेकर बोथली आणि सोरना जलाशयात पाण्याची पातळी न्युनतम झाली आहे.
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १३़६२ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा २२.४६ टक्के आहे़
जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे.
जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १६़४५२ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ २ जानेवारी रोजी ६३ प्रकल्पात ८१़८३६ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ६७़२२ एवढी होती. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)