५२ शेतकऱ्यांनी आवळला गळफास
By Admin | Updated: December 31, 2015 00:33 IST2015-12-31T00:33:24+5:302015-12-31T00:33:24+5:30
यावर्षी सन २०१५ मध्ये जिल्हयात ५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ...

५२ शेतकऱ्यांनी आवळला गळफास
नापिकी प्रमुख कारण : यावर्षी अर्धे पीकही हाती आले नाही
भंडारा : यावर्षी सन २०१५ मध्ये जिल्हयात ५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात जानेवारी महिन्यात तीन, फेब्रुवारी महिन्यात ०१, मार्च महिन्यात ०४, एप्रिल मध्ये ०५, मे मध्ये ०७, जून मध्ये ०२, जुलै ०५, आॅगस्ट ०३, सप्टेंबर ०४, आॅक्टोंबर ०६, नोव्हेंबर ०६, डिसेंबर ०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा समावेश आहे.
पिपरी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण यावर्षात ही घटना गाजली. प्रकल्पासाठी संपादित केलेली शेतजमिन व घराचा मोबदला न मिळाल्याने पिपरी येथील रघुनाथ कारेमोरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी जमिन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला तातडीने द्या, अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
कारेमारे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून खिशात ठेवली होती. त्यात त्यांनी संपादीत जमिनीचा मोबदला न मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते. त्यानंतर तहसीलदार घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सामान्य रूग्णालयात आणला असता ग्रामस्थांनी संपादित जमिनीचे पैसे द्या, ही मागणी लावून धरली. त्यामुळे तणावाची स्थिती होती. दरम्यान लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी धीरजकुमार, उपविभागीय अधिकारी संपत खिल्लारी, तहसीलदार सुशांत बनसोडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणने ऐकून घेतले होते. यावर्षाच्या खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे नापिकी झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. (नगर प्रतिनिधी)