५१८ बालके कुपोषणाच्या विळख्यात
By Admin | Updated: July 11, 2015 01:40 IST2015-07-11T01:40:19+5:302015-07-11T01:40:19+5:30
जिल्ह्यातील १,१९६ अंगणवाडी केंद्रातून ८७ हजार ८३८ बालके शिक्षण व जीवनाचे प्राथमिक शिक्षण घेत आहेत.

५१८ बालके कुपोषणाच्या विळख्यात
प्रशांत देसाई भंडारा
जिल्ह्यातील १,१९६ अंगणवाडी केंद्रातून ८७ हजार ८३८ बालके शिक्षण व जीवनाचे प्राथमिक शिक्षण घेत आहेत. यापैकी ५१८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ही बालके कुपोषणाच्या विळख्यात असले तरी महिला व बाल विकास विभागाकडून ‘आॅल ईज वेल’ असल्याचे सांगितले जात आहे.
मागील तीन दशकाहून अधिक काळापासून राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे मुलांच्या विकासात लक्षणीय सुधारणा झाली, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण पोषण आहार पद्धतीमध्ये व्यापक बदल होणे गरजेचे आहे. भंडारा जिल्ह्यात १,१९६ अंगणवाडी तर १०९ मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. १,१९० सेविका व १,१७१ मदतनिसांच्या माध्यमातून या अंगणवाडी केंद्रांवरील बालकांचे पालन पोषण तथा त्यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जात आहे. जून महिन्याच्या शेवटी बालविकास प्रकल्प विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार महिला व बाल विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात शुन्य ते ६ वर्षे वजन गटातील बालकांची संख्या ८७ हजार ८३८ असल्याची नोंद आहे. यातील वयानुसार वजन केलेल्या कुपोषणासंदर्भातील नोंद झालेल्या तीव्र कमी वजन गटात मोडणारी ५१८ बालके आहेत. साधारण श्रेणीत ८३ हजार ८४९ बालकांचा समावेश आहे. कमी वजन गटातील बालकांची संख्या ३ हजार ४७१ ईतकी आहे.
पवनी तालुक्यात सर्वाधिक
यात सर्वाधिक तीव्र कमी वजनाच्या क्षेणीतील बालके ही पवनी तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिक १०२ बालकांचा कुपोषणाच्या श्रेणीत समावेश आहे. त्याखालोखाल लाखनी तालुक्यात ९८ बालके तर सर्वात कमी ४१ बालके साकोली तालुक्यात आहे. ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्प क्षेत्रामधील अंगणवाडीतील ६ महिने व ३ वर्षे वयोगटातील लाभार्थी, गरोदर व स्तनदामाता, तीव्र कमी वजनाची बालके यांना घरपोच आहार पुरविला जाते. आहारात गहु, गुळ, सोयाबीन, शेंगदाणे आदींचा समावेश आहे.
अर्भक व बालकांच्या पोषण पद्धतीत बदल करणे, आहारात विविधता आणणे, उपलब्ध अन्न पदार्थांचा योग्य वापर करणे, सुक्ष्म पोषक तत्वांचा आहार रासायनिक पध्दतीने समृद्धीकरण करणे, आरोग्याच्या दृष्टिने वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता लसीकरण याबाबत जनजागृती करणे या मुद्यांवर भर देणे गरजेचे झाले आहे.
बालविकास प्रकल्पांच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांचे नियमित वजन केले जाते. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना घरपोच आहार दिला जातो. अन्य जिल्ह्याच्या तुलनेत भंडाऱ्याची संख्या कमी असून भंडारा जिल्हा कुपोषणच्या विळख्यात नाही. हा जिल्हा कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
- पी.जे. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण),
जिल्हा परिषद, भंडारा.