रोहयोची ५०० कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:35 IST2019-01-29T23:35:03+5:302019-01-29T23:35:24+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा प्रगतीपथावर असून पाच वर्षात जिल्हाभरात सुमारे ५०० कोटींची कामे करण्यात आली. या माध्यमातून २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन काम उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांचे स्थलांतरण थांबवून विकास योजनांनाही गती आली आहे.

रोहयोची ५०० कोटींची कामे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा प्रगतीपथावर असून पाच वर्षात जिल्हाभरात सुमारे ५०० कोटींची कामे करण्यात आली. या माध्यमातून २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन काम उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांचे स्थलांतरण थांबवून विकास योजनांनाही गती आली आहे.
शासनाच्या महत्वकांक्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेला भंडारा जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात २ लाख १० हजार ५६७ कुटुंबांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून या नोंदणीकृत कुटुंबांना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले. ग्रामीण क्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त असून या योजनेची किमान ५० टक्के अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले. विकासाचे विकेंद्रीकरण आणि रोजगाराची निर्मिती होत आहे.
भंडारा जिल्ह्यात २०१४ मध्ये १ लाख १५ हजार २५२ कुटुंबातील २ लाख ३५ हजार ६३५ मजुरांना मागणीनुसार स्थानिक क्षेत्रात काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ९९ कोटी २५ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आला. ५२ लाख ४९ हजार मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. २०१५-१६ मध्ये १ लाख १६ हजार ६३४ कुटुंबातील २ लाख ४८ हजार ८८२ मजुरांना काम देण्यात आले. त्यावर १०२ कोटी २७ लाख २००० रुपये खर्च झाला. ५९ लाख ७६ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यात आले.
२०१६-१७ मध्ये १ लाख २२ हजार १३७ कुटुंबातील २ लाख ६५ हजार १६९ मजुरांना स्थानिक काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ११४ कोटी ६७ लाख ९ हजार खर्च झाला. यावर्षी ५५ लाख १४ हजार मनुष्यदिन काम निर्मिती करण्यात आली. २०१७-१८ मध्ये १ लाख २६ हजार ४४ कुटुंबातील २ लाख ७३ हजार ९८५ मजुरांना मागणीनुसार काम उपलब्ध करून देण्यात आले.
त्यावर ११९ कोटी १३ लाख ३१ हजार रुपये खर्च झाले. ५३ लाख १३ हजार मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली.
१०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल
भंडारा जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये डिसेंबर अखेर १ लाख ३१ हजार १२० कुटुंबातील २ लाख ८३ हजार ३३८ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ७९ कोटी ४८ लाख १३ हजार रुपये खर्च झाले. यावर्षात जिल्ह्याला ५९ कोटी ३५ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत ४३ लाख ९ हजार काम पूर्णत्वास गेले आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने विकासासोबतच स्थानिक पातळीवर मजुरांना काम उपलब्ध झाले आहे.