३६ हजार ४७ शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत
By Admin | Updated: January 22, 2015 00:35 IST2015-01-22T00:35:14+5:302015-01-22T00:35:14+5:30
जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील एक, मोहाडी तालुक्यातील २४, तुमसर ९, पवनी ४८, लाखांदूर ३४, लाखनी ३८ याप्रमाणे एकूण १५४ गावांना राज्य शासनाने टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले आहे.

३६ हजार ४७ शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील एक, मोहाडी तालुक्यातील २४, तुमसर ९, पवनी ४८, लाखांदूर ३४, लाखनी ३८ याप्रमाणे एकूण १५४ गावांना राज्य शासनाने टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे १५४ गावांतील ३२ हजार ९९२ अल्पभूधारक आणि ३ हजार ५५ असे एकूण ३६,०४७ शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत मिळणार आहे.
धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केलीे. यात १५४ गावांची ५० पैसेपेक्षा कमी तर ६९३ गावांची ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आलीे.
५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या १८.९० कोटी निधीपैकी ८.९ कोटी रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलीे. जिल्हा प्रशासनाने सहा तालुक्यात ८.९ कोटी रुपयांचा निधी तहसिलदारांना वितरीत केला आहे.
भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या दोन लक्षच्या घरात असली तरी नुकसान भरपाईचा लाभ टंचाईग्रस्त १५४ गावांतील ३२ हजार ९९२ अल्पभूधारक आणि ३ हजार ५५ असे एकूण ३६,०४७ शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत मिळणार आहे.
यात भंडारा तालुक्यातील ३५७, पवनी ८,०२९, तुमसर १,६३४, मोहाडी ७,४९२, लाखांदूर ९,३९०, तर लाखनी तालुक्यातील ९,१४५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांसाठी जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, दहावी व बारावी परिक्षेचे शुल्क माफ, रोहयो अंतर्गत निकषात शिथीलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी टँकरने पुरविणे, कृषीपंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सध्या तालुकास्तरावर प्रशासनातर्फे ज्यांनी आतापर्यंत बँकेचे खाते उघडले नाही, त्यांच्याकडे लक्ष केंद्रीत करून त्यांना जनधन योजनेअंतर्गत खाते उघडण्याचे आव्हान करीत आहेत.