प्रशांत देसाई - भंडाराइंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटची संस्कृती फॅड सर्वत्र फोफावले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात पाल्य टिकला पाहिजे, यासाठी पालक मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालतात. यामुळे जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी ३४ प्राथमिक शाळांमधील (इयत्ता पहिली ते चवथी) पटसंख्या दहाच्या आत असल्याने या शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शासनाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजनासह पाठ्यपुस्तके मोफत व शालेय गणवेश वाटप करण्यात येत आहे. स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवित आहेत. यामुळे जिल्ह्यातील ३४ प्राथमिक शाळांची पटसंख्या दहा विद्यार्थ्यांच्या आत आहे. परिणामी ‘त्या’ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यात जिल्हा परिषदच्या २३ शाळांचा समावेश असून नगरपालिकेच्या चार तर खासगी सात शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये सर्वाधिक १३ शाळा भंडारा तालुक्यातील आहेत. त्यानंतर पवनी तालुक्यातील १२ शाळांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील तीन, साकोली दोन, लाखांदूर तीन व लाखनी तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे.सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षण विभागाची अद्ययावत माहिती संग्रहीत करण्याची प्रक्रीया यू-डायसच्या माध्यमातून सुरू आहे. शैक्षणिक सत्र २०१४-१५ ची माहिती शिक्षण विभागाने संग्रहीत केली आहे. यात जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती प्राप्त झाली आहे. ही माहिती शिक्षण विभागासाठी धक्कादायक आहे. शाळांची पटसंख्या ३० असणे आवश्यक आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून शर्थीचे प्रयत्न होत असले तरी, जिल्हा परिषद शाळांमध्ये पाल्यांना शिकविण्याचा पालकांचा कल नाही. त्यामुळे या शाळांवर अवकळा आली आहे. पटसंख्या कमी असली तरी, या शाळांवर शासनाने दोन शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात अनेक शाळांवर पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी असतानाही तिथे शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून तेथील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केल्यास वेतनावर होणारा खर्च वाचेल. जिल्ह्यातील ३४ शाळांमध्ये पटसंख्येचा विचार केल्यास या शाळांची अवस्थ दयनीय असून त्यात जिल्हा परिषद शाळांचाच समावेश आहे.
३४ प्राथमिक शाळांना ‘शेवटची घटका’
By admin | Updated: January 10, 2015 22:47 IST