२,८०८ सर्पदंश, ६,१५० जणांना कुत्र्याचा चावा
By Admin | Updated: July 26, 2014 23:56 IST2014-07-26T23:56:42+5:302014-07-26T23:56:42+5:30
जिल्ह्यात धान शेती मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. मागील तीन वर्षांत २,८०८ जणांना सापाने चावा घेतला असून यात १५ जणांचा मृत्यू झाला.

२,८०८ सर्पदंश, ६,१५० जणांना कुत्र्याचा चावा
तीन वर्षात १५ जणांचा मृत्यू : ग्रामीण भागात श्वानदंशांचे प्रमाण अधिक
भंडारा : जिल्ह्यात धान शेती मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. मागील तीन वर्षांत २,८०८ जणांना सापाने चावा घेतला असून यात १५ जणांचा मृत्यू झाला. यापेक्षा भयावह आकडेवारी श्वानदंशांची असून मागील तीन वर्षात ६,१५० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असून सुदैवाने मृत्यूच्या घटना घडलेल्या नाहीत.
श्वानदंशांच्या घटना
ग्रामिण रुग्णालय स्तरावर २०१२-१३ या वर्षात २,९८८ जणांना कुत्र्याने चावा घेतला. २०१३-१४ मध्ये २,३५५ जणांना, २०१४-१५ मध्ये ७७० जणांना कुत्र्याने चावा घेतला असून मृत्यूची घटना नाही.
प्राथमिक आरोग्य व उपकेंद्र स्तरावर २०१०-११ या वर्षात ७६८ जणांना कुत्र्याने चावा घेतला. २०११-१२ या वर्षात ९७८ जणांना, २०१२-१३ मध्ये १,०२८ जणांना, २०१३-१४ मध्ये ७७७ जणांना तर २०१४-१५ मध्ये २३७ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
सर्पदंशांच्या घटना
ग्रामिण रुग्णालय स्तरावर २०१२-१३ या वर्षात ३४५ जणांना सापाने दंश केला असून ८ जणांचा मृत्यू झाला. २०१३-१४ मध्ये ३६८ जणांना चावा घेतला असून ७ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. २०१४-१५ मध्ये ५३ जणांना सर्पदंश झाला असून मृत्यूच्या घटना नाहीत.
प्राथमिक आरोग्य व उपकेंद्र स्तरावर २०१०-११ या वर्षात २५ जणांना सापाने दंश केला. २०११-१२ या वर्षात ३६ जणांना, २०१२-१३ मध्ये २१ जणांना, २०१३-१४ मध्ये १३ जणांना तर २०१४-१५ मध्ये ३ जणांना सर्पदंश झाला असून कुणाचाही मृत्यू नाही. असे एकूण मागील तीन वर्षांत २,८०८ जणांना सापाने चावा घेतला असून त्यांना सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात १५ जणांना जीव गमवावा लागला.
एप्रिल ते जून २०१४ या कालावधीत सामान्य रूग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या १० रुग्णालयामध्ये सर्पदंशाचे ५३ रूग्ण दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार झाल्याने सर्पदंश झालेल्या नागरिकांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले. (प्रतिनिधी)
अशी घ्या काळजी़़़
ज्या परिसरात साप अधिक आहेत असे वाटते़, त्या ठिकाणी शक्यतोवर खाटेवरच झोपावे़ सोबत टॉर्च ठेवावी़ रात्री घराबाहेर जाताना बुट घालून निघावे़ याशिवाय हातात काठी ठेवावी़ परंतु, या काठीचा उपयोग साप मारायला करायचा नाही़ काठीने जमीनीवर ठकठक करीत चालायचे़ जमिनीचे कंपनं सापाला कळतात़ त्यामुळे तोच वाटेतून दूर होतो़ आश्रमशाळांमध्ये सर्पदंशाने विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घडतात. आश्रमशाळा व वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशीच काळजी घ्यायला हवी. गावात रात्रीच्या वेळी पथदिवे सुरू राहिल, अशी व्यवस्था करायला हवी. गावठी उपचार न करता सर्पदंश झाल्यानंतर थेट रूग्णालयात दाखल होण्याची गरज आहे.