२८ लाखांचे चुकारे अडले
By Admin | Updated: January 25, 2015 23:08 IST2015-01-25T23:08:15+5:302015-01-25T23:08:15+5:30
पालोरा येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ३५३५.३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. जवळपास २० लाखांच्या चुकाऱ्यांचे वाटप झाले असले तरी २८ लक्ष रूपयांचे चुकारे थकीत आहेत.

२८ लाखांचे चुकारे अडले
पालोऱ्यातील प्रकार : शेतकरी मेटाकुटीला
युवराज गोमासे - करडी (पालोरा)
पालोरा येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ३५३५.३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. जवळपास २० लाखांच्या चुकाऱ्यांचे वाटप झाले असले तरी २८ लक्ष रूपयांचे चुकारे थकीत आहेत. दुष्काळसदृश स्थिती असताना चुकारे अडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व मोहाडी तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वतीने पालोरा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मोठा गाजावाजा करून आ.चरण वाघमारे यांनी केंद्राचे उद्घाटन केले. त्यावेळी त्वरीत धानाच्या चुकाऱ्यांचे वाटप केले जाईल. अडचणी सोडविल्या जातील, असे जाहीर आश्वासन देण्यात आले होते. शेतकरीही आश्वस्त झाले होते. मात्र सद्य परिस्थिती वेगळीच आहे. चुकाऱ्यांच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. चुकाऱ्यांच्या हुंड्या न आल्याने धान्याची रक्कम देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पालोरा येथील धान खरेदी केंद्रावर ‘ब’ ग्रेडच्या धानाची खरेदी करण्यात आली. दि.११ डिसेंबर २०१४ रोजी पालोरा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पटांगणावर खरेदी केंद्र उघडण्यात आले. परिसरातील ते एकमेव केंद्र असल्याने तसेच धान्य साठविण्याची, गोडावूनची कमतरता असल्याने चार ठिकाणी केंद्र हलवून हमी भावात धानाची खरेदी केली जाते. पालोरा, कोका, जांभोरा येथील केंद्रावर खरेदी झाल्यानंतर करडी येथील कृषी गोडावूनमध्ये खरेदी सुरु आहे. याठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाची साठवणूक केली आहे. डिसेंबर २०१४ ते २२ जानेवारी २०१५ पर्यंत एकूण ३५३.३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. एकूण ४८ लाख ८ हजार ८ रुपयांची खरेदी झाली. जवळपास २० लाखाच्या चुकाऱ्यांचे वाटप शेतकऱ्यांना आतापर्यंत करण्यात आले. मात्र हुंड्या न आल्याने शेतकऱ्यांचेन २८ लाख ८ हजार ८ रुपयांचे चुकारे अडले आहेत. रब्बी हंगामात करावयाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्याचप्रमाणे मुलामुलींच्या वैवाहिक कार्यक्रमासाठी गरज असताना चुकारे थकीत झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.