२२० केव्हीचे उपकेंद्र सुरू होणार
By Admin | Updated: April 30, 2017 00:22 IST2017-04-30T00:22:03+5:302017-04-30T00:22:03+5:30
भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था बळकट करण्याकरीता केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशिल आहे.

२२० केव्हीचे उपकेंद्र सुरू होणार
नाना पटोले : विद्युत व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार कटीबद्ध
भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था बळकट करण्याकरीता केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. विद्युत व्यवस्थेचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो. कमी-अधिक दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतो. यामुळे नागरिकांच्या घरातील उपकरणे बंद पडत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या मध्यभागी साकोली किंवा सौंदड येथे २२० केव्हीचे उपकेंद्र बनविण्यात येणार असून याकरीता ३० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आल्याचे खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
यावेळी आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे उपस्थित होते. यावेळी खा.नाना पटोले म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यासाठी स्ट्रक्चर ऊभारले जाणार आहे. यासाठी महावितरणच्या दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. पुढील ५० वर्षात नागरिकांना वीज पुरवठ्यसंदर्भात कोणतीही अडचण येऊ नये याकरीता केंद्र सरकारच्या दीनदयाल उपाध्याय विद्युत बळकटीकरण योजनेंतर्गत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ४,५०० कोटीची कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
वादळ, वारा, पावसामुळे विद्युत खांबावरील वीज तारांच्या एकमेकांचा स्पर्श होवून वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्याकरीता भंडारा, तुमसर व पवनी येथील भूमिगत वीज तारांचे जाळे पसरविण्यात येणार असून उर्वरीत शहरांचा यात समावेश करण्यात येणार आहे. आयपीडीसी योजनेंतर्गत निवडक कार्यालयामध्ये सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येणार असून तो प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करून वीज बचतीचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कृषि पंपाची मागणी असून मार्च २०१६ पर्यंतच्या सर्व कृषिपंपाच्या जोडण्या पूर्ण झाल्याचे सांगत कृषी पंपाची थकबाकी ८० कोटीच्या जवळपास असल्याचे सांगितले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची शेती होत असून या पिकाला पाण्याची आवश्यकता असते. शेतकरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्याने पाण्याची पातळी खालावल्याने आज जिल्ह्यातील ४० गावे रेड झोनमध्ये असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)