२२ हजार बिडी कामगार संकटात
By Admin | Updated: April 18, 2016 00:23 IST2016-04-18T00:23:50+5:302016-04-18T00:23:50+5:30
केंद्र सरकारच्या 'टोबॅको प्रोहिबिशन अॅक्ट'च्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यातील सर्व बिडी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय बिडी कारखानदारांनी घेतला आहे.

२२ हजार बिडी कामगार संकटात
रोजीरोटी धोक्यात : केंद्राच्या विरोधात बिडी कारखाने बंद
भंडारा : केंद्र सरकारच्या 'टोबॅको प्रोहिबिशन अॅक्ट'च्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यातील सर्व बिडी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय बिडी कारखानदारांनी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २२ हजार कामगारांसमोर उदरनिर्वहाचा प्रश्न उभा झाला आहे.
राज्यातील बिडी उद्योग आणि सरकार यांच्यात बंडलावरील छाप किती आकाराचा असावा, यावरून संघर्ष चालू आहे, त्यातून गेल्या काही दिवसांत बिडी कारखाने बंद पडले आहेत. भंडारा जिल्ह्यातील कारखाने आठवडा झाला बंद आहेत आणि त्याचा परिणाम जिल्ह्यातील २२ हजार बिडी कामगार आणि संबंधित रोजंदारांवर झाला आहे. सराफी व्यवसाय बंद असल्याने कारागिरांचे दैनंदिन उत्पन्न बुडते आहे आणि बिडी कामगारांची तर रोजीरोटीची पंचाईत झाली आहे.
केंद्र सरकारने बिडी बंडलावर ८५ टक्के सचित्र वैज्ञानिक इशारा घालण्याचे बंधन १ एप्रिल २०१६ पासून लागू केले आहे. या जाचक अटी मान्य नसल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक बिडी कारखाने बंद आहेत. अशिक्षित आणि बेरोजगार महिला हा व्यवसाय गृहउद्योग म्हणून करतात, त्यांना रोजंदारीवर काम करावे लागते. एक महिला साधारण एक हजार बिड्या रोज बनवते. हा रोजगारच बंद झाल्याने त्याचे दैनंदिन उत्पन्न बुडाले आहे.
देशभरातील १५ राज्यांतून सुमारे ८० लाख कामगार काम करतात. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात हा उद्योग चालतो. महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, नागपूर, सोलापूर, संगमनेर, अहमदनगर, पुणे, मुंबई, सिन्नर, नाशिक, नांदेड, देगळूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात बिडीचे उत्पन्न होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २ लाख ५६ हजार बिडी कामगार काम करीत आहेत. बिडी वळण्याचे काम १३ राज्यांत चालते. तेंदूपत्ता संग्रहन, तोडणारे कामगार, तंबाखू पिकवणारे छोटे शेतकरी, शेतमजूर यांचा रोजगार बिडी उद्योगावर अवलंबून आहे. बिडी उद्योग हा पारंपरिक व खूप जुना आहे. शिवपुराणात धूम्रपानाचा संदर्भ आहे तसा उपयोगही आहे. गेली एक हजार वर्षे तंबाखू पीक म्हणून भारतीयांना माहिती आहे.
या व्यवसायात अशिक्षित आदिवासी खेड्यापाड्यात, दरीडोंगरात गाव आणि छोट्या नगरात राहणारे आर्थिक दुर्बल घटकातील लोक काम करतात. महिलांची संख्या तर लक्षणीय असून, त्यांना बिडी उद्योगाशिवाय उत्पन्नाचे साधन नाही. संपूर्ण कुटुंबच बिडी व्यवसायावर चालते, अशी काही राज्यांची स्थिती आहे.
अमेरिकेमध्ये बिडीविषयी संशोधन झाले असून, अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला की, बिडीमध्ये वापरली जाणारी घटके पूर्णपणे नैसर्गिक आहेत. यामध्ये भेसळ नाही. बिडी पिल्यानंतर जी तरतरी येते ती डी जीवनसत्त्वामुळे येते. याचे कारण तेंदूपत्ता उन्हात सुकवला जातो. यामुळे या पानामध्ये डी जीवनसत्त्व भरले जाते म्हणूनच अभ्यासकांनी बिडी ही हर्बल असल्याचा निष्कर्ष काढला. एक ग्रॅम तेंदूपत्त्यापासून ५ ते ६ बिड्या बनवल्या जातात, त्यामुळे सिगारेटच्या तुलनेत अल्प तेंदूपत्ता असतो. बिडी उद्योग बंद झाल्यास बेरोजगारी वाढेल. बिडी कामगार व उद्योग वाचला पाहिजे म्हणून लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)