जिल्ह्यात २० टक्के क्षेत्र रोवणीविना

By Admin | Updated: September 5, 2016 00:36 IST2016-09-05T00:36:02+5:302016-09-05T00:36:02+5:30

पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील ३२ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रातील पेरणी अद्यापही खोळंबली आहे.

20 percent of the district is without field | जिल्ह्यात २० टक्के क्षेत्र रोवणीविना

जिल्ह्यात २० टक्के क्षेत्र रोवणीविना

पावसाची दडी : शेतकऱ्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे संकट
देवानंद नंदेश्वर भंडारा
पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील ३२ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रातील पेरणी अद्यापही खोळंबली आहे. खरीप हंगामासाठी सध्यस्थितीत १ लाख ७७ हजार ९२ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी करण्यात आली आहे़ जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड निर्धारीत करण्यात आले होते. आतापर्यंत ८४ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आजही २० हजार ५६५ हेक्टर क्षेत्रातील रोवणी खोळंबली आहे.
१ लाख ५३ हजार ८९० हेक्टरमधील रोवणी आटोपली असली तरी पाण्याअभावी रोवणी करपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाची गडद छाया आहे.
पावसाने दडी मारल्याने येथील शेतपिके पाण्याअभावी संकटात सापडली आहे. पावसाळ्याच्या पूर्वार्धात मुसळधार पडणाऱ्या पावसाने अचानकपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वषापुर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. पावसाची अनियमितता व शेतपिके उभे असताना शेतपिकांना बसलेला वादळी फटका यामुळेही शेती व्यवसायावर चांगलाच आघात झाला. शेतकऱ्यांच्या हिंमतीला संकटाची मालीकाच पुजली आहे. या ना त्या, कारणाने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतच जात आहे. शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव असल्याने अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाऊस बेपत्ता असल्याने शेतकरी संकटाच्या खाईत लोटला आहे. कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची अवस्था आज क्षणाक्षणाला वाईट होत चालली आहे. सिंचनाचा अभावामुळे अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु निसर्गही आता लहरीपणाने वागायला लागला आहे.यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दररोज वातावरण ढगाळलेले होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत आहे. या प्रकारामुळे पिकांवर लष्करी अळी, तुळतुळा आदी रोगाने धान पिके ग्रासलेली आहे. एकीकडे पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे धानावर रोग अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरीवर्ग सापडलेला आहे.
शासनाने मदतीचा हात म्हणून किटकनाशके औषधी विनामूल्य देऊन शेतकरी अश्रू पुसण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संपूर्ण शेतकरीवर्ग संतापलेला आहे. सध्या उन्हाळ्यासारखे ऊन तापायला लागले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे तापमान वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे शेतातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाच्या सोयी आहेत, अशा शेतकऱ््यांवर विजेचे संकट उभे ठाकले आहे. २४ तासातून बारा ते सोळा तास भारनियमनामुळे ग्रामीण भागातील वीज गायब राहते. शेतीला पाणी केव्हा द्यायचे आणि जेवायचे, झोपायचे केव्हा, हेच शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे. एकूणच तिहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. या महिन्यात भारनियमन केले नाही तर किमान जलसिंचन चांगले होईल व पिकाला पाणी मिळेल, अशी आशा बाळगणारा बळीराजा आशेवरच आहे.

Web Title: 20 percent of the district is without field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.