गोसीखुर्दचे १९ दरवाजे उघडले

By Admin | Updated: June 23, 2015 01:11 IST2015-06-23T01:11:54+5:302015-06-23T01:11:54+5:30

मागील आठवडाभरात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती.

19 doors of Gosikhurd opened | गोसीखुर्दचे १९ दरवाजे उघडले

गोसीखुर्दचे १९ दरवाजे उघडले

जनजीवन विस्कळीत अनेक गावे जलमय  कोरंभी-गणेशपूर मार्ग बंद
भंडारा : मागील आठवडाभरात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती. सायंकाळ नंतर जोर धरलेल्या पावसाने सोमवारी दुपारी ३ वाजतानंतर उसंत घेतली. दरम्यान जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे. गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने ०.५० मिटरने १९ वक्रद्वारे उघडण्यात आले आहे. शहरालगत वाहणारा नाला दुथडी भरून वाहत असल्याने भंडारा कोरंभी मार्ग बंद झाल्याने सहा गावांचा संपर्क तुटला आहे.
रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. सायंकाळच्या सुमारास पावसाने जोर धरला तो आज दुपारी ३ वाजतापर्यंत कायम होता. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले होते. पहिल्या पावसाने जोमदार हजेरी लावल्याने शहरासह ग्रामीण भागातीलही मुख्य मार्गावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागत आहे. उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने कोरडे पडलेले नदीनाले आता ओसंडून वाहू लागले आहे. वैनगंगा नदीच्या कारधा पुलावरून ३७ हजार ४१६ क्युसेस पाणी वाहत आहे. वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर काल सायंकाळी ५.३८ मिटर पाण्याची पातळी असल्याची नोंद करण्यात आली होती. रात्रभर पाऊस सुरु असल्याने यात वाढ झाली आहे. सोमवारला दुपारी ४ वाजता या पाण्यात २० सेंमी ची वाढ झाली असून सध्या पाण्याची पातळी ५.५८ मिटरपर्यंत पोहचली आहे.
संततधार पावसामुळे नदीच्या प्रवाहातून गोसीखुर्द धरणात पाणी विसर्ग होत असल्याने धरणाची पाणीपातळी समतोल ठेवण्यासाठी धरणाची १९ वक्रद्वारे ०.५० मिटरने उघडण्यात आली आहे. धरणात २४०.६०० मिटर पाणी असून धरणाची पातळी स्थिर ठेवण्यासाठी २४० मिटर पाणी ठेवले जाते. ६०० मिटर पाणी क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने सोमवारला सकाळी धरणाचे ३ गेट ०.५० मिटरने उघडण्यात आले होते. सध्या धरणात ६६ हजार ४ क्युसेस पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सायंकाळी ५.३० च्या सुमारास धरणाची पातळी कायम ठेवण्यासाठी आणखी १६ असे १९ गेट उघडण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)

सहा गावांचा संपर्क तुटला

भंडारा : भंडारा शहरालगतच्या गणेशपूर जवळून वाहणारा नाला सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदीच्या बॅकवॉटरमुळे दुथडी भरून वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने पिंडकेपार, कोरंभी, सालेबर्डी, खैरीपांदी, जवाहरनगर, कवडसी या सहा गावांचा भंडारा शहराशी संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात ६८ घरांची पडझड
जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार १ ते २२ जून पर्यंत ६८ घरांची पावसामुळे पडझड झाली आहे. विजेमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झालेले आहेत. यासोबतच ११ जनावर मृत तर एक जखमी झाला आहे. ४३ घरांची व २४ गोठ्यांची अंशत: पडझड झाली आहे. मोहाडी तालुक्यातील एक घर पूर्णत: पडले असून जिल्ह्यात एकूण ६८ घरे पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पावसाने जोर धरला असल्याने नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. गोसीखुर्द धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहे. रात्रभर पाऊस सुरु राहिल्यास किंवा मध्यप्रदेशातील धरणातून पाणी सोडल्यास नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना याचा धोका निर्माण होऊ शकतोण यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Web Title: 19 doors of Gosikhurd opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.