२४ दिवसांत १६३ टक्के पाऊस
By Admin | Updated: June 25, 2015 00:30 IST2015-06-25T00:30:48+5:302015-06-25T00:30:48+5:30
पावसाच्या नक्षत्रांना प्रारंभ होताच वरुण राजानेही मुक्त हस्ताने हजेरी लावली आहे.

२४ दिवसांत १६३ टक्के पाऊस
शेतकरी सुखावला : जिल्ह्यात ४० टक्के पेरणी पूर्ण
भंडारा : पावसाच्या नक्षत्रांना प्रारंभ होताच वरुण राजानेही मुक्त हस्ताने हजेरी लावली आहे. मागील २४ दिवसात जिल्ह्यात १६३ टक्के पाऊस बरसला आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून धान पेरणी जोमात सुरु आहे.
जिल्ह्यात दि.१ जून ते ३० सप्टेंबर पर्यंत अशा कालावधीत तालुकानिहाय दैनंदिन पर्जन्यमानाची नोंद करण्यात येत असते. यावर्षी दि.१ जून ते २४ जून या कालावधीत एकुण सरासरी २५५.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी याच तारखेला १५६.५ मि.मी. पाऊस बरसला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची टक्केवारी थोडी अधिक आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून धान उत्पादक शेतकऱ्याला पेरणीसाठी वेळ मिळाला आहे. गत २४ दिवसात भंडारा तालुक्यात ३१९.३ मि.मी., मोहाडी ३२३.३ मि.मी., तुमसर २४९.४ मि.मी., पवनी २४७.६ मि.मी., साकोली २०८.९ मि.मी., लाखांदूर १५७.३ मि.मी. तर लाखनी तालुक्यात २८४.७ मि.मी. पाऊस बरसला आहे. या सर्वांची बेरीज १७९०.५ असून सरासरी २५५.८ मि.मी. आहे. जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी १३३०.२ मि.मी. बरसला पाहिजे, अशी नोंद करण्यात येत असते. ३० सप्टेंबर पर्यंत बरसलेल्या पावसाच्या आधारावर टक्केवारी काढण्यात येते. सध्या मागील २४ दिवसात २०१४ च्या तुलनेत ६३ टक्के पाऊस अधिक बरसला. (प्रतिनिधी)
आठ गेट अर्ध्या मीटरने सुरु
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची रिपरीप होती. त्यामुळे नदीनाल्यातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. हा जलसाठा गोसेखुर्द धरणात विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची पाणी पातळी समतोल ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या दिवशी १९ वक्रद्वार ०.५० मिटरने उघडली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने आणखी सहा दरवाजे असे २५ दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. पाऊस मंदावला असून आज दुपारनंतर उर्वरीत १७ गेट बंद करण्यात आली आहेत. सध्या गोसीखुर्दची ८ वक्रद्वार ०.५० मिटरने उघडी ठेवण्यात आली आहे. यातून ७७४ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. रात्रभर पावसाने जोर धरल्यास उद्या आणखी काही वक्रद्वारे उघडण्यात येतील.