१४९ गावांमध्ये ‘पाणीटंचाई’चे सावट!
By Admin | Updated: January 14, 2015 23:01 IST2015-01-14T23:01:38+5:302015-01-14T23:01:38+5:30
जिल्ह्यातून वाहणाऱ्या जीवनदायिनी वैनगंगेचा जलस्तर पाहता आणि भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा असला तरी जीर्ण जलवाहिनी ठिकठिकाणी फुटलेली आहे. या जलवाहिनीमुळे कुठे दूषित तर कुठे

१४९ गावांमध्ये ‘पाणीटंचाई’चे सावट!
टँकरमुक्त जिल्हा : १.८२ कोटींचा आराखडा, गावांचे होणार सर्वेक्षण
इंद्रपाल कटकवार - भंडारा
जिल्ह्यातून वाहणाऱ्या जीवनदायिनी वैनगंगेचा जलस्तर पाहता आणि भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा असला तरी जीर्ण जलवाहिनी ठिकठिकाणी फुटलेली आहे. या जलवाहिनीमुळे कुठे दूषित तर कुठे अनियमित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यात १४९ गावांसाठी २९३ उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजनांसाठी एक कोटी ८२ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे. म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत गत २० वर्षांपासून टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे.
तलावांची लक्षणीय संख्या व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरही पाण्याची समस्या भेडसावत आहे. मे महिन्यात अनेक गावांमध्ये पाणी पेटणार आहे.
जिल्ह्यात ७९६ गावे आहेत. जिल्हा प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ एप्रिल ते जूनचा कृती आराखडा तयार केला. यात ६१ विहीरी खोल करणे आणि त्यातील गाळ काढण्याचे प्रस्तावित आहेत. २२ नळयोजनांची दुरूस्ती तर १८ गावांमधील १२३ विंंधन विहीरींची दुरूस्ती, १९ ठिकाणी कुपनलिका घेण्याचा प्रस्ताव असला तरी ही कामे अद्याप झालेली नाहीत. या गावांमध्ये पाणी टंचाई असली तरीसुद्धा टँकर किंवा बैलबंडीने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था नाही. यासाठी जिल्ह्यातील एकूण १४९ गावांसाठी १ कोटी ८२ लक्ष रुपयांची उपाययोजना प्रस्तावित आहे. परंतु त्यापूर्वी गावात सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.