बावनथडी प्रकल्पात १२ टक्के जलसाठा
By Admin | Updated: April 18, 2016 00:25 IST2016-04-18T00:25:41+5:302016-04-18T00:25:41+5:30
एप्रिल हीटमुळे जिवनदायीनी बावनथडी नदी चक्क कोरडी पडली आहे. नाकाडोंगरी व परिसरातील शेत विहिरी कोरड्या पडल्याने ऊस व भाजीपाल्याची शेती संकटात सापडली आहे.

बावनथडी प्रकल्पात १२ टक्के जलसाठा
बावनथडी नदीचे झाले वाळवंटात रुपांतर : नाकाडोंगरी परिसरातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर
मोहन भोयर तुमसर
एप्रिल हीटमुळे जिवनदायीनी बावनथडी नदी चक्क कोरडी पडली आहे. नाकाडोंगरी व परिसरातील शेत विहिरी कोरड्या पडल्याने ऊस व भाजीपाल्याची शेती संकटात सापडली आहे. बावनथडी प्रकल्पातून बावनथडी नदी पात्रात पाणी सोडण्याची येथे गरज आहे. पंरतु नियोजनाच्या अभावी प्रकल्पातील पाणी तीन तलावात यापूर्वी सोडण्यात आले व बावनथडी कालव्यावर वन्यप्राण्यांकरिता पूलाचे बांधकाम सुरु असल्याने पाणी तिथे देण्यात येत आहे.
नाकाडोंगरी व परिसरात बावनथडी नदी काठावर गाळाची सुपिक शेती आहे. दरवर्षी या परिसरातील शेतकरी ऊस व भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणात करतात. या शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाकरिता विहिरी आहेत, पंरतु जिवनदायीनी बावनथडी नदीपात्र यावर्षी कोरडे पडले आहे. नदीपात्रात पाणी आटल्याने विहिरींना पाणी नाही. त्या कोरड्या पडल्या आहेत. तर काही विहिरींची पाणी पातळी अतिशय खोल गेली आहे. पाणी संकटामुळे ऊस व भाजीपाल्याचे पीक धोक्यात आले आहे.
बावनथडी प्रकल्पातून बावनथडी नदीपात्रात पाणी सोडल्यास येथील पीके वाचू शकतात, परंतु तथा हालचाली येथे दिसत नाही. बावनथडी प्रकल्पात सध्या केवळ मृत जलसाठा असल्याची माहिती आहे. यापूर्वी रब्बीच्या पिकाकरिता बावनथडी प्रकल्पातून कारली, आंबागड व बघेडा येथील तलाव भरण्यात आले होते. त्यावेळी बावनथडी प्रकल्पात जलसाठा होता.
वाईल्ड लाईफ प्रकल्पाकरिता पाणी
बावनथडी प्रकल्प परिसरात घनदाट जंगल असून येथील मुख्य कालव्यावर प्राण्यांना ये-जा करण्याकरिता १२ ते १५ पूल तयार करण्यात येत आहेत. त्यांच्या बांधकामाकरिता सध्या पाण्याचा वापर सुरु आहे.
१२ टक्के जलसाठा
बावनथडी प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा आहे. या जलसाठ्याला तांत्रिक भाषेत मृत जलसाठा असे म्हणतात. हे पाणी नदीत प्रवाहीत केल्यास त्याला जोर नसतो. म्हणून प्रकल्पातून पाणी सोडता येत नाही.
बावनथडी प्रकल्पातून पाणी नदीत सोडण्याची गरज असून याकरिता लोकप्रतिनिधीवर दबाव वाढत आहे. पीकांच्या बचावाकरिता पाणी सोडावेच लागेल. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
- शेखर कोतपल्लीवार, उपसभापती पं.स. तुमसर
तीन तलावात यापूर्वी पिकांकरिता पाणी सोडण्यात आले. सध्या वाईल्ड लाईफच्या पुलांकरिता पाण्याचा वापर सुरु आहे. प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणी शिल्लक आहे. तांत्रिकदृष्ट्या पाणी सोडता येत नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते.
- राजेश हटवार, सहायक अभियंता बावनथडी प्रकल्प