१०० हेक्टरचा तलाव कोरडा
By Admin | Updated: April 5, 2017 00:23 IST2017-04-05T00:23:27+5:302017-04-05T00:23:27+5:30
देवरी-गोंदी येथील शंभर हेक्टरमधील तलाव सदोष बांधकामामुळे ३४ वर्षानंतरही कोरडा पडलेला आहे.

१०० हेक्टरचा तलाव कोरडा
जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी : देवरीगोंदी तलाव पुनरूज्जीवनाच्या प्रतीक्षेत
पालांदूर : देवरी-गोंदी येथील शंभर हेक्टरमधील तलाव सदोष बांधकामामुळे ३४ वर्षानंतरही कोरडा पडलेला आहे. देवरीगाव जलयुक्त शिवार योजनेत येत असल्याने त्याला न्याय देताना तलावाचे पुनरूज्जीवन होईल, अशी अपेक्षा देवरी-गोंदी ढिवरखेडा येथील ग्रामस्थांना आहे.
देवरी-गोंदी हे गाव जंगलव्याप्त परिसरात आहे. या गावाला रोजगार मिळावा या हेतूने जंगलाला लागून असलेल्या शेतीला पाणी मिळेल, यासाठी १९७५ मध्ये १०० हेक्टरमध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तलावाचे गेट व नहर चुकीच्या पद्धतीने बनल्यामुळे पहिल्या पावसाळ्यातच तलाव भरला; मात्र शेतीकरिता सिंचन होऊ शकले नाही. २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे गेटला तडा गेल्यामुळे तलाव गेट वाहून गेल्यामुळे तलाव कोरडा झाला आजही हा तलाव कोरडा ठण्ण पडला आहे.
तलाव मोठा असल्याने व नैसर्गिक साधनसामुग्री असल्याने हजारो एकरातील सिंचन व मासेमार बांधवांना रोजगार देण्याकरीता हा तलाव सोयीचा असल्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत खंडाईत यांनी खासदार नाना पटोले यांना याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी लोकलेखा समितीकडे हा विषय लावून धरत देवरीगोंदी तलावाच्या पुनरूज्जीवनाची मागणी केली.
आमदार बाळा काशिवार यांनी १० जानेवारीला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी, वनअधिकारी, तलाठी, सरपंच यांच्यासोबत तलाव व परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी लाभार्थी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करीत मुख्य गेट, वेस्टवेन व कालव्याची दुरूस्ती महत्त्वाची असल्याची बाब पुढे आली. मागील दोन वर्षापासून या प्रकरणाला गती आलेली नाही. आ.बाळा काशिवार यांनी पत्रपरिषदेत ८६ लाख रूपयांची मंजुरी मिळाल्याचे सांगितले आहे. पावसाळ्यापुर्वी या तलावाचे पुनरूज्जीवन व्हावे, अशी मागणी देवरी, गोंदी, ढिवरखेडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)