लागवडीखालील १० टक्के क्षेत्र पडित
By Admin | Updated: September 23, 2016 00:36 IST2016-09-23T00:36:41+5:302016-09-23T00:36:41+5:30
जिल्ह्यात धान्य लागवडीखालील येणाऱ्या क्षेत्रापैकी जवळपास १० टक्के क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहेत.

लागवडीखालील १० टक्के क्षेत्र पडित
धानाचे क्षेत्र सहा टक्के : पावसाचा फटका, बळीराजा पुन्हा संकटात
भंडारा : जिल्ह्यात धान्य लागवडीखालील येणाऱ्या क्षेत्रापैकी जवळपास १० टक्के क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहेत. यात धानपिकाखालील क्षेत्राची टक्केवारी सहा इतकी आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास उत्पादनात घट होणार काय, अशी चिंताही सतावू लागली आहे. परिणामी बळीराजा पुन्हा सुलतानी संकटात सापडणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी चालू खरीप हंगामात एकूण दोन लक्ष नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रात लागवडीखालील क्षेत्राअंतर्गत विविध धान्य पिकांची लागवड करण्याचे उद्दीष्ट होते. यापैकी एक लक्ष ८७ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी करण्यात आली. एकूण लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्रापैकी पेरणी झालेल्या क्षेत्राची टक्केवारी ८९.५६ इतकी आहे. त्यामुळे ढोबळ मानाने लागवडीखालील क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहे.
यावर्षी भातपिकाच्या सर्वसाधारण एक लक्ष ८२ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रापैकी एक लक्ष ७२ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. याची टक्केवारी ९४.३९ टक्के इतकी आहे. तसेच एकूण कडधान्याचे पेरणीक्षेत्र ११ हजार ३७८ इतकी आहे. याची टक्केवारी ९३.१७ इतकी आहे. एकूण तेलबिया पिकाचे पेरणी क्षेत्र १२०९ हेक्टर एवढे असून त्याची टक्केवारी १५.५३ आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड करण्यात येत असली तरी बेभरोशाच्या पावसावर बळीराजाची साद असते. पावसाच्या लहरीपणामुळे हंगामाच्या सुरूवातीलाच पाऊस बरसला नाही. जुलै महिन्यात मुसळधार पावसाला सुरूवात होताच सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीसह रोवणी कामालाही सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने काही तालुक्यांमध्ये रोवणीची कामे खोळंबली होती. १५ दिवसांपूर्वी वरूणराजाने हजेरी लावताच खोळंबलेली रोवणी करण्यात आली असली तरी जिथे पाऊस बरसला नाही तिथे मात्र अजुनही रोवणी खोळंबलेली असून पऱ्हे पिवळे पडले आहेत. अस्मानी संकटाचा फटका बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे.
या आठवड्याच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी हलक्या धानाला याचा फायदा होणार आहे. मात्र भारी धानाला पुन्हा पावसाची प्रतिक्षा राहणार आहे. (प्रतिनिधी)